मंगळवारच्या घटनेला जबाबदार कोण? : स्मार्ट सिटी की धोकादायक सिटी? वनविभाग, हेस्कॉम लक्ष देणार काय?
प्रतिनिधी बेळगाव
बेळगावचा स्मार्टसिटीमध्ये समावेश झाला. त्यानंतर स्मार्टसिटीच्या कामांना सुरूवात झाली. मात्र स्मार्ट सिटी होण्याऐवजी समस्याच अधिक होताना दिसत आहेत. पदपथाचे काम सुरू झाले. त्यानंतर पदपथ शेजारी असलेल्या झाडाभोवती पेवर्स बसविले जाऊ लागले. त्यामुळे झाडाच्या मुळांना आधारच मिळणे अवघड झाले. त्यामुळे अशी झाडे पडून अनेकांचे जीव जाऊ लागले आहेत. त्याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मंगळवारी आरटीओ ते कित्तूर चन्नम्मा सर्कल रस्त्यावरील जुने तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोरील झाड कोसळून एका दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यामधून केवळ सुदैव म्हणून एक जण बचावला. या घटनेनंतर पुन्हा तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. वास्तविक मंगळवारी पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. मात्र अचानक भले मोठे झाड कोसळले आणि दुर्दैवी घटना घडली. आता या घटनेची जबाबदारी कोण स्वीकारणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरामध्ये अशा प्रकारे यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. दुचाकींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी देखील अजूनही महापालिका, वनविभाग, हेस्कॉम जागे होत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. स्मार्टसिटी अंतर्गत कामे केली जात आहेत. ही कामे करताना झाडे वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र त्या झाडांना मजबूतपणा येण्यासाठी वन विभाग किंवा स्मार्ट सिटीचे अधिकारी काहीच करण्यास तयार नाहीत. महत्त्वाचे म्हणजे धोकादायक झाड असेल तर ते हटविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वळीव स्वरुपाचा पाऊस मोठय़ा प्रमाणात कोसळत आहे. जोरदार वाऱयासह पावसाचे आगमन होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक झाडे कोसळून मोठे नुकसान होत आहे. 19 एप्रिल 2022 रोजी क्लब रोडवर जुनाट झाड कोसळून एका केएबीमधील निवृत्त कर्मचाऱयाचा मृत्यू झाला आहे. विजय यल्लाप्पा कोल्हापुरे असे त्या दुर्दैवी व्यक्तींचे नाव आहे. त्याच दिवशी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील भले मोठे झाड कोसळून तब्बल 20 हून अधिक दुचाकींचे नुकसान झाले होते. याचबरोबर अनेक ठिकाणी झाडे कोसळून चार चाकी तसेच दुचाकींचे नुकसान झाले आहे. असे असताना आजपर्यंत वनविभाग आणि हेस्कॉम तसेच स्मार्टसिटीच्या अधिकाऱयांनी काहीच गांभीर्य घेतले नाही.
झाडे मजबूत कशी होतील? किंवा मजबूत झाडे कोणती? याबद्दल कोणीच अभ्यास करत नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे ही हवीच. मात्र झाडांमुळे जीव जात असेल तर ती झाडे हटविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. दरवषी झाडे कोसळून दोन ते तीन जणांचा जीव जात आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. हेस्कॉमचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे.
यापूर्वी पावसापूर्वी धोकादायक झाडे तसेच झाडांच्या फांद्या हटविल्या जात होत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून धोकादायक झाडांचा सर्व्हे करण्यात आला नाही किंवा धोकादायक झाड आहे म्हणून ते हटविले गेले नाही. यामुळेच असे अपघात घडत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. शहरामध्ये अनेक जुनाट झाडे आहेत. 100 वर्षांहून अधिक वर्ष झालेली झाडे आहेत. ती झाडे मजबूत आहेत असे सांगितले जाते. मात्र स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे झाडांना लागूनच पेवर्स घातले जात आहेत. त्यामुळे झाडाच्या बुंध्याला पाणी, हवा, मिळत नाही. त्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होत आहेत. परिणामी झाडे जीर्ण होऊन ती कोसळू लागली आहेत.
कोल्हापुरे यांच्या मृत्यूने त्यावेळी व्यक्त झाली होती हळहळ
केएबीमधून निवृत्त झालेले विजय यल्लाप्पा कोल्हापुरे हे बेळगाव मातंग कॉलनी को-ऑप. सोसायटीचे चेअरमन होते. ते कामानिमित्त शहरात गेले होते. दुपारी काम आटोपून ते आपल्या मोटारसायकलवरुन घरी जात होते. क्लबरोडवरुन हर्षा शोरुमच्या बाजूने असलेल्या रस्त्याने ते काळीआमराईकडे जात असताना तेथे असलेले झाड त्यांच्या अंगावर कोसळले. झाड कोसळल्याने विजय कोल्हापुरे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला.
धोकादाय झाडे हटवावी, अशी मागणी त्यावेळी झाली होती. मात्र काही दिवसांतच या गंभीर घटनांचा विसर साऱयांना पडला. त्यामुळे पुन्हा मंगळवार दि. 13 रोजी ही घटना घडली आहे.
वीज पुरवठा वारंवार खंडित
वळीवाचा पाऊस किंवा मान्सूनचा पाऊस सुरू झाला की वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये मोठी वाढ झाली आहे. विद्युत तारांवर झाडे तसेच फांद्या कोसळून काही भाग एक ते दीड दिवस अंधारात राहत आहे. याबद्दल तक्रारी देखील वाढल्या आहेत. शहराबराब्sार ग्रामीण भागातही पाऊस आला की नेमकी वीज गायब होते. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. तेंव्हा पावसाळय़ापूर्वी धोकादायक झाडे आणि फांद्या हेस्कॉमने देखील हटविणे तितकेच महत्वाचे आहे, असे बोलले जात आहे.
19 एप्रिल 2022 रोजी घडलेली घटना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान रोडवरील नागशांती शोरुमसमोर रांगेने पार्किंग केलेल्या दुचाकींवर झाड कोसळले. झाडाचा बुंद्या मोठा असल्याने त्या दुचाकींचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. केवळ सुदैव म्हणून तेथे कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. काही नवीन दुचाकी तर काही कर्मचाऱयांच्या आणि दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांच्या दुचाकी होत्या. त्यामुळे मोठा फटका दुचाकीस्वारांना बसला. या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. अनेकांच्या गाडय़ा झाडाच्या खाली अडकल्या होत्या. मात्र पावसाच्या रुद्रावतारामुळे केवळ आपल्या दुचाकीकडे हताश होऊन पाहण्यापलिकडे कोणीही काहीच करु शकले नाही. पाऊस कमी झाल्यानंतर अनेकजण त्या ठिकाणी आले. मात्र झाडाचा बुंद्या मोठा असल्यामुळे तो हलविणे अशक्मय झाले होते.
धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
एकाचा बळी : मनपा-वनखाते उदासीन : नागरिक संतप्त
शहरातील धोकादायक झाडांमुळे मंगळवारी एका युवकाला प्राण गमवावा लागला. वादळी पावसामुळे कमकुवत झाडांची पडझड सुरू असल्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र वनखाते आणि मनपाला याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
वनखात्यामार्फत दरवर्षी लाखो रोपे लावून वृक्षारोपण केले जाते. मात्र धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वादळी पावसामुळे झाडांची पडझड वाढली आहे. त्यामुळे घर, दुकाने आणि इतर साहित्याचे नुकसान होत आहे. त्याबरोबर धोकादायक झाडांमुळे जीव जाण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. त्यामुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न समोर आला आहे.
शहरात रस्त्याच्या दुतर्फा, सरकारी जागा, खुल्या जागा आणि इतर ठिकाणी झाडांची संख्या अधिक आहे. यामध्ये जुन्या जीर्ण झालेल्या झाडांची संख्यादेखील अधिक आहे. दरम्यान, या झाडांचा वेळोवेळी सर्व्हे होत नसल्याने ही झाडे आता मानवासाठी धोकादायक ठरू लागली आहेत. धोकादायक झाडे हटविण्याची जबाबदारी वनखाते आणि महापालिकेवर आहे. मात्र या दोन्ही खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने धोकादायक झाडे हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे घटना वाढू लागल्या आहेत.
स्मार्ट सिटीच्या कामावेळी या झाडांची मुळे तोडली गेली आहेत. त्यामुळे अशी कमकुवत झाडे कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. गटारी, रस्ते, पेव्हर्स, डेनेज लाईन या विकासकामांच्या खोदाईमुळे झाडांची मुळे तोडली गेली आहेत. दरम्यान झाडांचा आधारच नाहीसा झाल्याने अशी जुनाट झाडे धोकादायक ठरू लागली आहेत.
अर्जांना केराची टोपली
शहरातील धोकादायक झाडे हटवा, अशा मागणीचे अर्ज वनखात्याकडे येत असतात. मात्र वनखाते या अर्जांची छाननी किती करते याबाबतही प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय मनपा आणि वनखात्याच्या समन्वयाअभावी अर्जांना केराची टोपली दाखविली जाते. धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनविभागाला रितसर अर्ज करणे आवश्यक आहे. वनखात्यात अर्ज केल्यानंतर तो पुढे रेंज ऑफीसकडे पाठविला जातो. त्यानंतर संबंधित झाडाची पाहणी करून अहवाल तयार केला जातो. दरम्यान महानगरपालिकेकडून त्या झाडाबाबत एनओसी घेतले जाते. त्यानंतर निविदा काढून संबंधित झाड हटविले जाते.
झाडे हटविण्यासाठी अर्ज कसा करावा
घराच्या किंवा रस्त्याच्या शेजारी धोकादायक झाड असल्यास संबंधित झाडाचा फोटो आणि अर्ज वनखात्याच्या सहाय्यक वनसंरक्षण अधिकाऱयांच्या नावाने दाखल करावा. तर आपल्या खासगी मालमत्तेत घराच्या सभोवती धोकादायक झाड असल्यास वनखात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मनपाकडून एनओसी ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे
धोकादायक वृक्षांसाठी नागरिक वनखात्याकडे अर्ज करू शकतात. मात्र मनपाकडून एनओसी ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे असते. त्यानंतरच झाडांची पाहणी करून ते हटविले जाते. शहरातील सार्वजनिक ठिकाणी धोकादायक असलेल्या झाडांसाठी मनपाने अर्ज करणे आवश्यक आहे.
– पुरुषोत्तम रावजी (आरएफओ वनखाते)