मूळ गावी येणाऱयांची संख्या अधिक : विविध मार्गांवर अतिरिक्त बससेवा
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. लांब पल्ल्यांसह इतर ठिकाणांहून ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिवहनने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विविध मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत. विशेषतः पुणे, मुंबई, नाशिक, बेंगळूर, म्हैसूर आणि गोवा येथून येणाऱया प्रवाशांची संख्या वाढत आहे.
गणेशोत्सवासाठी मूळ गावी परतणाऱया नागरिकांची संख्या अधिक असते. दरम्यान, शनिवार-रविवार सुटी असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी गणेशोत्सवासाठी शाळांना सुटी सुरू झाली आहे. त्यामुळे सहकुटुंब गावी परतणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वातानुकूलित बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. विशेषतः लांब पल्ल्यासाठी रात्रीच्या वेळेला बस धावत असल्याने काही बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
गणेशोत्सवासाठी मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, बेंगळूर, म्हैसूर आदी ठिकाणी 80 जादा बस धावत आहेत. शिवाय प्रवाशांच्या मागणीनुसार बसफेऱया वाढविल्या जाणार आहेत. शनिवार-रविवार सुटी असल्याने काही नागरिकांनी शनिवारीच गावी येणे पसंत केले. त्याबरोबर रविवारीही सुटी असल्याने प्रवाशांची संख्या वाढणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी मूळ गावी परतणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे.
बसस्थानकात शनिवारी प्रवाशांची वर्दळ वाढली होती. विशेषतः लांब पल्ल्याच्या बसगाडय़ांना प्रवासी अधिक दिसून येत आहेत. मुंबई, पुणे येथून येणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. दरम्यान, परिवहनने मुंबई-पुणे मार्गावर अतिरिक्त बस सोडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर होत आहे. याबरोबरच वातानुकूलित बस रात्रीच्या प्रवासासाठी विविध मार्गांवर धावत आहेत.
जादा वातानुकूलित बस उपलब्ध : रात्रीच्या प्रवासासाठीही धावणार विविध मार्गांवर
गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने विविध मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या प्रवासासाठी वातानुकूलित एसी बस धावत आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक आदी ठिकाणी 24 अतिरिक्त बस धावत आहेत. 10 सप्टेंबरपर्यंत या जादा बस धावणार आहेत.
गणेशोत्सव काळात ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी परिवहनने जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, हैद्राबाद, कोल्हापूर आदी ठिकाणी अतिरिक्त बस धावणार आहेत. मंगळवारी बेंगळूर येथून बेळगावकडे जादा बस सोडल्या जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी मूळ गावी येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असते. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीखातर परिवहनने साधी आणि वातानुकूलित बस सुरू केली आहे. याबरोबर गोव्यासाठीही जादा बस धावत आहेत.
बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र आणि गोवा राज्ये लागून असल्याने बेळगाव विभागातून गोवा आणि महाराष्ट्रात जादा बस सोडल्या जाणार आहेत. यासाठी परवानगी घेण्यात आली आहे. इतर विभागांच्या तुलनेत बेळगाव विभागाचा महसूल अधिक आहे. कोरोना काळात परिवहनला मोठा फटका बसला होता. दरम्यान, आर्थिक घडी कोलमडली होती. त्यामुळे विविध माध्यमांतून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध सणांसाठी जादा बस सोडल्या जात आहेत.