7 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हप्त्याच्या रकमेत बदल ः व्याप्ती वाढविण्याचा उद्देश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मंगळवारी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (पीएमएसबीवाय) हप्ता वाढविला आहे. या दोन्ही विमा योजना केंद्र सरकारच्या प्रमुख विमा योजनांमध्ये सामील आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा हप्ता वाढवून 1.25 रुपये प्रतिदिन केला आहे. यामुळे वार्षिक हप्ता आता 330 रुपयांवरून वाढत 436 रुपये झाला आहे. केंद्र सरकारने यासंबंधी एक वक्तव्य जारी केले आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 12 रुपयांपासून वाढवत 20 रुपये करण्यात आला आहे. हे नवे दर 1 जूनपासून लागू होणार आहे.
31 माचपर्यंत या पीएमजेजेबीआय आणि पीएमएसबीवाय या योजनांमध्ये अनुक्रमे 6.4 कोटी आणि 22 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे. या दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून दाव्याची रक्कम जमा केली जात आहे. या दोन्ही योजनांच्या हप्त्यामध्ये मागील 7 वर्षांमध्ये कुठलाच बदल करण्यात आला नव्हता.
नवे दर अन्य खासगी विमा कंपन्यांनाही योजना लागू करण्यास प्रोत्साहित करतील. यामुळे विमा योजनांच्या लाभार्थींच्या संख्येत वृद्धी होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. भारताला पूर्णपणे विमायुक्त समाज करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्देश पूर्ण करण्यासाठी पुढील 5 वर्षांमध्ये पीएमजेजेबीवाय अंतर्गत व्यापी 6.4 कोटींवरून वाढत 15 कोटी तर पीएमएसबीआय अंतर्गत 22 कोटीवरून 37 कोटी लोकांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे.
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपये मिळतात. या योजनेचा लाभ 18 ते 50 या वयोगटातील कुठलाही व्यक्ती घेऊ शकतो.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत दुर्घटनेत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण दिव्यांगत्व प्राप्त झाल्यास 2 लाख रुपयांची भरपाई मिळते. या योजनेच्या अंतर्गत विमाधारक आंशिकदृष्टय़ा दिव्यांग झाल्यास त्याला 1 लाख रुपयांची मदत मिळते. या योजनेत 18-70 या वयोगटातील कुठलाही व्यक्ती सामील होऊ शकतो.