सलग सुटय़ांमुळे ये-जा करणाऱयांची संख्या अधिक : परिवहनच्या महसुलात वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती या सलग सुटय़ांमुळ प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. सलग सुटय़ांमुळे लांबचा प्रवास करणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिवहनच्या महसुलातही काही प्रमाणात वाढ झाली आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे सण, सुटय़ा आणि इतर दिवशी अधिक बस सोडून परिवहन महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायडे, शनिवारी हनुमान जन्मोत्सव तर रविवारी कार्यालयीन सुटी यामुळे नोकरदार वर्गांना सलग चार दिवस सुटी मिळाली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱयांची संख्या वाढली आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी आंबेडकर व महावीर जयंती साजरी केली गेल्याने स्थानिक बसेसनादेखील प्रवाशांची संख्या वाढली होती.
लांब पल्ल्याच्या मार्गांवर जादा बसची व्यवस्था
सलग सुटय़ांमुळे मुंबई, पुणे आणि बेंगळूर येथून येणाऱया प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढलेली असते. याकरिता लांब पल्ल्याच्या मार्गांवर परिवहन महामंडळाने जादा बसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वातानुकूलित बसलाही प्रवासी वाढत आहेत.
मार्गात बदल केल्याने गैरसोय
डॉ. आंबेडकर जयंती आणि महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही मार्गात बदल करण्यात आले होते. शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.