जोरदार पावसामुळे शिवारातही पाणी : भातरोप लागवडीला प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडाभरापासून जोरदार पावसाला प्रारंभ झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. शिवाय नदी, नाले आणि धरण क्षेत्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे बेळगाव तालुक्मयाची जीवनदायिनी असलेल्या मार्कंडेय नदीपात्रातदेखील पाणी वाढले आहे. मागील दोन वर्षांत नदी पात्राबाहेर पडली होती. मात्र यंदा नदीपात्राबरोबर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. पुन्हा पावसाने जोर वाढविल्यास मार्कंडेयदेखील पात्राबाहेर पडणार आहे.
यंदा जून महिना कोरडा गेला. त्यामुळे नदी आणि धरण क्षेत्राच्या पाणीपातळीत घट झाली होती. मात्र जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून दमदार पावसाला प्रारंभ झाल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. मागील दोन वर्षांत मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदीला पूर आला होता. दरम्यान, शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली होती. शिवाय काही गावांचा संपर्कही तुटला होता. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन शेतकरी जागृत झाले आहेत. शिवाय प्रशासनानेदेखील योग्य खबरदारी घेतली आहे.
अद्यापही दमदार पावसाची गरज
जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे भातरोप लागवडीला प्रारंभ झाला आहे. मात्र सुरळीत भातरोप लागवड करण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे.