पंधरा दिवसात निर्णय घेण्याची मागणी : विविध दलित संघटना-वाल्मिकी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अनुसुचित जाती, जमातीची लोकसंख्या वाढत असली तरी आरक्षण मात्र वाढविण्यात आले नाही. त्यामुळे अन्याय होत असून तातडीने अनुसुचित जाती, जमातीच्या आरक्षणामध्ये वाढ करावी. या मागणीसाठी स्वामीजी श्री श्री प्रसन्नानंद पुरी यांनी बेंगळूर येथे आंदोलन केले होते. तरीदेखील सरकारने गांभीर्याने घेतले नाही म्हणून विविध दलित संघटना व वाल्मिकी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. येत्या 15 दिवसांत याचा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
वाल्मिकी समाजाची 80 लाख लोकसंख्या राज्यामध्ये आहे. याचबरोबर दलितांचा आकडाही वाढत चालला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण वाढविण्यात आले नाही. त्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण समाजावर होत आहे. पुन्हा सर्व्हे करून आरक्षणामध्ये वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाल्मिकी समाजाला केवळ 3 टक्के आरक्षण आहे. लोकसंख्येच्या मानाने हे कमी आहे. तेंव्हा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाल्मिकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार, सेपेटरी दिनेश बागडे, सुनील सनके, अजित नाईक, पांडुरंग नाईक, संजय नाईक, सुरेश गवण्णावर, भावकाण्णा भंग्यागोळ, वाय. एच. कोळेकर, बसवराज दोडमनी, अशोक नाईक यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचेही दुर्लक्ष…
बेंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे स्वामीजी श्री श्री प्रसन्नानंद पुरी यांनी 100 दिवस आंदोलन केले आहे. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या प्रतिनिधींना पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. सरकार गांभीर्याने विचार करून लवकर निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे स्वामीजींनी आंदोलन मागे घेतले. मात्र अजून याबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.