ग्राम पंचायत सदस्यांचे अधिकारी – कंत्राटदारांना निवेदन
प्रतिनिधी /येळ्ळूर
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. येळ्ळूर रस्त्यावर ब्रिज होणार आहे. त्या ब्रिजची उंची व रुंदी अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहतुकीला अडचण होणार आहे. सतत रहदारी असलेल्या रस्त्यावरील ब्रिजची उंची वाढवावी यासाठी येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना तसेच अशोक बिल्डकॉन कंपनीचे व्यवस्थापक लक्ष्मण चौगुले यांना हे निवेदन देण्यात आले आहे.
येळ्ळूर-वडगाव रस्त्यावर केवळ 4 मीटर (13 फूट) उंची आणि 12 मीटर (39 फूट) रुंदीचे ब्रिज होत आहे. मात्र हे ब्रिज वाहतूक पाहता लहान होणार आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतीला याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार तातडीने ग्राम पंचायतच्या माध्यमातून ब्रिजची उंची व रुंदी वाढविण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
येळळूर रस्त्यावरून खानापूर, देसूर, सुळगा, राजहंसगड, नंदिहळ्ळी यासह इतर परिसरातील वाहने ये-जा करत असतात. ऊस, गवत, सुका चारा घेवून जाणारी वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रहदारी वाढली आहे. त्यासाठी किमान 12 मीटर (39 फूट) उंची तर 20 मीटर (65 फूट) रुंदी वाढवावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, राजू डोण्य़ाण्णावर, जोतिबा चौगुले, कल्लाप्पा मेलगे आदींसह अन्य मंडळी उपस्थित होती.