बाडमेरमध्ये काँग्रेसला भाजपकडून नव्हे तर अपक्ष उमेदवाराकडून मोठे आव्हान मिळत आहे. बाडमेर मतदारसंघात तीनवेळा विजयी झालेले मेवाराम जैन हे चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मतदारसंघात विकासकामांवरून लोकांमध्ये असलेल्या नाराजीला जैन यांना सामोरे जावे लागत आहे. तर भाजपने दीपक कडवासरा यांना उमेदवारी दिली आहे. तुलनेत कमी जनसंपर्कामुळे कडवासरा हे कमकुवत उमेदवार ठरत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय मंत्री अशोक चौधरी यांच्या हस्तक्षेपामुळे कडवासरा यांना तिकीट मिळाल्याचे मानले जाते. तर दुसरीकडे अशोक चौधरी यांना मतदारसंघात मोठा विरोधही होत आहे. यामुळे ते कडवासरा यांच्या प्रचारमोहिमेत सामील होऊ शकलेले नाहीत. भाजपला बाडमेरमधील या स्थितीमुळे नुकसान होऊ शकते.
दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना सर्वात मोठे आव्हान भाजपच्या बंडखोर उमेदवार डॉ. प्रियांका चौधरी यांच्याकडून मिळत आहे. जाट समुदायाच्या प्रभावशाली राजकीय घराण्याच्या सदस्य प्रियांका चौधरी यांना भाजपच्या संभाव्य उमेदवार मानले जात होते. परंतु कडवासरा यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर चौधरींनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. बाडमेरमध्ये आता चौधरी याच विजयाच्या मुख्य दावेदार असल्याची चर्चा आहे. जाट तसेच अन्य समुदाय चौधरी यांच्यासोबत असल्याचे दिसून येते. आम्ही नरेंद्र मोदींसोबत आहोत. लोकसभा निवडणुकीत त्यांनाच विजयी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. तर राजस्थानात भाजपचे सरकार येईल. परंतु बाडमेरमध्ये आम्ही प्रियांका चौधरींना मतदान करू. भाजप येथे तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फेकला जाऊ शकतो असे अनेक भाजप कार्यकर्त्यांचे सांगणे आहे. तर मतदारसंघात बदल इच्छिणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे.