जकार्ता (इंडोनेशिया)
आशिया चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. मंगळवारी येथे झालेल्या सुपर-4 गटातील महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारताला 4-4 असे गोलबरोबरीत रोखले. भारताला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याकरिता या सामन्यात निर्णायक विजयाची जरूरी होती. आता या स्पर्धेत मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या सुपर-4 फेरीतील अन्य एका सामन्यात मलेशियाने जपानचा 5-0 असा दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. सुपर-4 फेरीमध्ये भारत, मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांनी प्रत्येकी पाच गुण मिळविले. पण सरस गोलसरासरीच्या जोरावर लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला कोरिया, मलेशियाने मागे टाकले. मलेशिया व दक्षिण कोरिया यांच्यात बुधवारी जेतेपदासाठी लढत होईल तर तिसऱया स्थानासाठी भारत व जपान यांच्यात लढत होईल.
मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतातर्फे निलम झेसने नवव्या मिनिटाला, दिप्सन तिर्कीने 21 व्या मिनिटाला, महेश शेशेगौडाने 22 व्या मिनिटाला आणि एस मारीश्वरनने 37 व्या मिनिटाला गोल नोंदविले. दक्षिण कोरियातर्फे जांग जाँगहेयुनने 13 व्या मिनिटाला, जी चेओनने 18 व्या मिनिटाला, कीम जुंगहुने 28 मिनिटाला आणि जुंग मेनजायने 44 व्या मिनिटाला गोल केले. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 3-3 असे गोल बरोबरीत होते. शेवटचे 27 सेकंद असताना कार्ती सेल्वमने भारताला जवळपास गोल नोंदवून दिलाच होता. पण द.कोरियन गोलरक्षकाने दोनदा अप्रतिम बचाव करीत भारताचे विजयाचे स्वप्न उद्ध्वस्त केले.