नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि असियान संघटना यांच्यात सहकार्यव्द्धी, समान रणनीती आणि आर्थिक भागीदारीवर सहमती झाली आहे. आसियान ही पूर्व आशियातील देशांची संघटना आहे. येथे गुरुवारी भारत-आसियान परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक पार पडली. त्यानिमित्ताने प्रसारित करण्यात आलेल्या वक्तव्यात ही माहिती आहे.
यंदाचे वर्ष भारत आणि ही संघटना यांच्या संबंधांचे 30 वे वर्ष आहे. यानिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे विदेश मंत्री एस. जयशंकर आणि सिंगापूरचे विदेश मंत्री व्हिव्हियन बालकृष्णन यांच्यात गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर वक्तव्य प्रसारित करण्यात आले. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान आदी देश या संघटनेचे मित्र देश आहेत. आसियानच्या सध्या कार्यरत असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून व्यापार, सुरक्षा सामाजिक-सांस्कृतिक विकास आदी क्षेत्रात प्रगती साध्य केली जाईल, असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले आहे.