एकतर्फी अंतिम लढतीत लंकेचा 8 गडी राखून धुव्वा
सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था
गोलंदाजांचा भेदक मारा आणि स्मृती मानधनाच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने श्रीलंकेचा 8 गडय़ांनी धुव्वा उडवत महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे जेतेपदावर एकतर्फी शिक्कामोर्तब केले. प्रारंभी, श्रीलंकेला 20 षटकात 9 बाद 65 धावांवर रोखल्यानंतर भारताने 8.3 षटकात 2 बाद 71 धावांसह सहज विजय संपादन केला.
14 वर्षांनंतर पहिलीच फायनल खेळणाऱया श्रीलंकेचा संघ फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाडय़ांवर अपयशी ठरला आणि त्यानंतर त्यांचा पराभव होणे ही निव्वळ औपचारिकता होती.
श्रीलंकेचा संघ 9 बाद 65 अशी किरकोळ धावसंख्या उभारु शकल्यानंतर भारताने 8.3 षटकातच सदर आव्हान पार केले. स्मृती मानधनाने अवघ्या 25 चेंडूत नाबाद 51 धावांची तडफदार खेळी साकारली.
लंकन कर्णधार चमारी अटापटू तिसऱया षटकात अनुष्का संजीवनीसमवेत धाव घेताना गोंधळ उडाल्यानंतर धावचीत झाली आणि इथून लंकेच्या पडझडीला सुरुवात झाली. स्वतः संजीवनी देखील नंतर केवळ सहा चेंडूंच्या अंतराने बाद झाली. ऑगस्टमधील राष्ट्रकुल स्पर्धेपासून उत्तम बहरात राहिलेल्या रेणुकाने हसिनी पेरेराला पहिल्याच चेंडूवर बाद केले. हसिनीने कव्हरवर झेल देत तंबूचा रस्ता धरला, त्यावेळी लंकेची 4 बाद 9 अशी दैना उडाली होती.
श्रीलंकेला यावेळी मोठय़ा भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, कविशा दिलहारी बाद झाली आणि त्यांचा डाव 5 बाद 16 असा आणखी गडगडला. राजेश्वरी गायकवाडने निलाक्षी डीसिल्व्हाचा त्रिफळा उडवला. ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने लंकेची पाहता पाहता 8 बाद 32 अशी दाणादाण उडाली. लंकेचा संघ 50 धावांचा टप्पा तरी पार करु शकणार का, याबद्दल यामुळे साशंकता निर्माण झाली होती. मात्र, रणवीराने 22 चेंडूत नाबाद 18 धावा जमवत संघाला तो टप्पा सर करुन दिला.
भारतीय संघाने भेदक गोलंदाजी साकारली. पण, लंकेच्या पडझडीला त्यांचे खराब फटके अधिक कारणीभूत ठरले. वास्तविक, उपांत्य फेरीत पाकिस्तानचा फडशा पाडला असल्याने लंकन संघ येथे थोडाफार अव्वल खेळ साकारण्याचा प्रयत्न करेल, असा होरा होता. पण, प्रत्यक्षात त्यांनी सपशेल लोटांगण घातले.
शफाली, जेमिमा स्वस्तात बाद
विजयासाठी 66 धावांचे किरकोळ आव्हान असताना शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्यूज स्वस्तात बाद झाल्याने भारताची खराब सुरुवात झाली. मात्र, लंकेला त्यानंतर अजिबात यश मिळाले नाही. स्मृती मानधनाने शानदार अर्धशतक झळकावले आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. स्मृतीने 3 षटकार व 6 चौकार फटकावत लंकन गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तिने एका षटकारानेच विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंकन महिला संघ ः 20 षटकात 9 बाद 65 (इनोका रणवीरा 22 चेंडूत 18, ओशादि रणसिंघे 20 चेंडूत 13. अवांतर 6. रेणुका सिंग 5 धावात 3 बळी, राजेश्वरी गायकवाड 2-16, स्नेह राणा 2-13).
भारतीय महिला संघ ः 8.3 षटकात 2 बाद 71 (स्मृती मानधना 25 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 51, हरमनप्रीत कौर 14 चेंडूत नाबाद 11, रॉड्रिग्यूज 2, शफाली वर्मा 5. रणवीरा, कविशा प्रत्येकी 1 बळी).