पाकिस्तानकडून काश्मीरचा उल्लेख केल्याबद्दल संतप्त टीका
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी शुक्रवारी काश्मीर मुद्दय़ावरील भारताच्या भूमिकेची निंदा करणारी भाषा वापरल्याने संतप्त झालेल्या भारतीय प्रतिनिधींनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. जो देश स्वतःच्या भूमीवरील दहशतवादाला प्रोत्साहन देतो, त्याने इतरांना शांतीचे डोस पाजू नयेत. ज्या देशाला खरोखरच शांतता हवी आहे, असा देश कधीही सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणार नाही. तसेच आपल्या भूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणार नाही. ज्या पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषींना संरक्षण दिले आहे, त्याने भारताला शांततेचा उपदेश करणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत फटकारले.
न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या 77 व्या सर्वसाधारण सभेला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. गुरुवारीच भारताचे विदेश व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी सर्वसाधारण सभेसमोर भारताची भूमिका विशद केली होती. शुक्रवारी पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी भारतावर धादांत खोटे आणि गैरसमज पसरविणारे आरोप केल्याने भारताने आपल्या प्रत्युत्तर देण्याच्या अधिकारांत पाकिस्तानला उघडे पाडले.
शरीफांचे साळसूद भाषण
पाकिस्तानला भारताबरोबर शांतता हवी आहे. तथापि, ती प्रस्थापित होण्यासाठी काश्मीर प्रश्नावर न्यायोचित तोडगा निघणे आवश्यक आहे. केवळ तसे झाल्यासच भारताबरोबर चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊ शकेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या भाषणात प्रतिपादन केले होते. मात्र, काश्मीरमधील अशांततेला पाकिस्तानच जबाबदार आहे, ही बाब त्यांनी लपवून ठेवली होती. भारताने शनिवारी पाकिस्तानच्या या साळसूदपणाचा कठोर शब्दात समाचार घेतला.
पाकमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार
पाकिस्तानमध्ये हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून तेथे बळजबरीने अपहरण, हिंदू, शीख आणि ख्रिश्चन कुटुंबातील मुलींचे मुस्लिमांबरोबर सक्तीचे विवाह आणि इस्लामेतर धर्मियांचे धर्मांतर आदी घटना घडत असून त्या मानवतेला काळिमा फासणाऱया आहेत. जगाने याची दखल घेऊन पाकिस्तानला धडा शिकविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघातील प्रतिनिधींनी केले.