‘होळकर’ची खेळपट्टीही फिरकीस अनुकूल, ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ इंदोर
येथील होळकर स्टेडियमवर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी आज बुधवारपासून सुरू होत असून या सामन्यातही फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची अपेक्षा आहे. हा सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसऱयांदा अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे ध्येय आहे. हा हेतू साध्य झाल्यास अहमदाबादमध्ये होणाऱया चौथ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाजीस अनुकूल खेळपट्टी बनवली जाईल. डब्ल्यूटीसीची अंतिम लढत लंडनमध्ये होणार असल्याने त्याच्या तयारीसाठी चौथ्या कसोटीत वेगवान खेळपट्टी बनवली जाणार आहे. येथील कसोटी सकाळी 9.30 वाजता सुरू होत असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका सुरू होण्याआधी भारताला डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका 3-0 किंवा 3-1 अशा फरकाने जिंकण्याची गरज होती. भारताने पहिल्या दोन कसोटी जिंकून त्यादिशेने मार्गक्रमण सुरू केले असून यासाठी तिसरी कसोटी महत्त्वाची ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्माने तर लंडनमध्ये होणाऱया अंतिम फेरीची मानसिक तयारीही सुरू केली असून अहमदाबादमध्ये होणाऱया कसोटीसाठी वेगवान खेळपट्टी बनविण्याची सूचना केली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातच डब्ल्यूटीसीची अंतिम लढत होण्याची जास्त शक्यता आहे. ‘इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे दोन्ही संघांसाठी पूर्णतः वेगळा अनुभव असेल. त्यामुळे अहमदाबादमधील सामना हा दोघांसाठी प्रिपरेटरी सामना ठरणार आहे. त्याबद्दल आम्ही याआधीच बोललो असून संघाला त्यासाठी आतापासूनच तयार करीत आहोत,’ असे रोहित माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला. डब्ल्यूटीसी अंतिम लढत 7 ते 11 जून या कालावधीत लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. आयपीएलनंतर लगेचच हा सामना सुरू होईल.
‘विदेशी वातावरणात शार्दुल ठाकुर हा भारताचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. कारण तो काहीतरी योजना घेऊनच आमच्याकडे येतो. त्याचे नुकतेच लग्न झाले आहे, त्यामुळे तो कितपत तयार आहे, हे मला माहीत नाही. त्याचा गोलंदाजीचा किती सराव झालाय हेही माहित नाही. मात्र तो विचारी गोलंदाज असल्याने त्याच्याकडे योजना निश्चितच असणार,’ असे रोहित म्हणाला. ‘आम्हाला हवा तसा निकाल या कसोटीत मिळाला तर चौथ्या कसोटीत आम्ही वेगळे करण्याचा विचार करू. मात्र सध्या या सामन्याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे आणि तेच योग्यही ठरेल,’ असेही तो म्हणाला.
भारतीय संघ मायदेशातील सलग 16 व्या मालिकाविजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठणे ही मोठी अचीव्हमेंट ठरेल. कारण घरच्या मैदानावरही जिंकणे फार सोपे नसते, असे त्याला वाटते. ‘आमच्यासाठी घरचे वातावरण असले तरी ते खूपच आव्हानात्मक आहे. फलंदाजांना सातत्याने धावा करणे खूपच कठीण आहे,’ असे तो म्हणतो. दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव झटपट गुंडाळला गेला. त्यावरून भारतीय कंडिशन्समध्ये खेळणे किती कठीण आहे, हेच दिसून येते. फक्त त्यांचीच नव्हे तर आमचीही तीच स्थिती होऊ शकते. मी नागपूरमध्ये 200 चेंडू खेळलो, पण मी स्थिरावलोय असे मला एकदाही वाटले नाही. कोणत्याही चेंडूवर बाद होऊ शकेन, असे वाटायचे. अशा खेळपट्टय़ांवर तुमची बाजू वरचढ आहे, असे कधीच मानता येत नाही. स्थिती बदलू शकतील, असे दर्जेदार स्पिनर्स आमच्याकडे असले तरी आम्ही कसोटी जिंकू, अशी त्यावरून खात्री देता येत नाही. शिस्तबद्ध खेळ आवश्यकच आहे, असेही रोहित म्हणाला. रोहितला आघाडी फळीतील फलंदाजांकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा असून जडेजा, अश्विन व अक्षर पटेल दोन कसोटीप्रमाणेच आपला जोम येथेही पुढे चालू ठेवातील, असे त्याला वाटते.
कसोटी सामना देशातील पाच प्रमुख केंद्रावरच आयोजित केल्या जाव्यात, असे माजी कर्णधार कोहलीला वाटते. मात्र देशातील प्रत्येक केंद्रावर सामने खेळवले जावेत, असे रोहितला वाटते. यामुळे प्रेक्षकांचा सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळेल, असे त्याचे मत आहे.
संभाव्य भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर.अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शमी, सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलिया संघ ः स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँडस्कॉम्ब, ट्रव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, लियॉन, लान्स मॉरिस, मर्फी, कुहनमन, रेनशॉ, स्टार्क, ऍगर, स्वेप्सन.
सामन्याची वेळ ः सकाळी 9.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून.