मोहालीवर भारताची आजवर सरस कामगिरी, वर्ल्ड कपसाठी मध्यफळी निश्चित करण्यावर भारताचे लक्ष
वृत्तसंस्था/ मोहाली
पुढील महिन्यात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणाऱया भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मंगळवारी सुरुवात होत असून पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. भारतीय संघ मध्यफळीतील कॉम्बिनेशन्स निश्चित करण्याचा या मालिकेतून प्रयत्न करणार आहे.
विश्वचषक स्पर्धेआधी एकूण सहा (ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 व द.आफ्रिकेविरुद्ध 3) टी-20 सामने होणार असून काही वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली असली तरी भारताचा पूर्ण ताकदीचा संघच मैदानात उतरणार आहे. टी-20 फॉरमॅट या प्रकारात लवचिकता जास्त महत्त्वाची असल्याने विश्वचषक स्पर्धेआधी आपल्या खेळाडूंकडून सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा कर्णधार रोहित शर्माने केली आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताने फलंदाजी चांगली केली असली तरी त्यात अनेक प्रयोग करण्यात आले होते आणि गोलंदाजीच्या खोलीतील अभाव या स्पर्धेत उघडा पडला होता. मात्र आता संघात जसप्रित बुमराह व हर्षल पटेल संघात परतल्याने ही बाजू मजबूत होण्यास मदत होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध केएल राहुल आपल्यासोबत सलामीलाच खेळणार असल्याचे कर्णधार रोहित शर्माने याआधीच स्पष्ट केले आहे. मात्र काही सामन्यात तो कोहलीला सलामीला खेळविण्याची शक्यता आहे. आशिया चषकातील अफगाणविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात कोहलीने नाबाद शतक नोंदवल्यामुळे त्याला आघाडीला खेळाविण्याचा मोह संघव्यवस्थापनाला होऊ शकतो. पहिले चार खेळाडू निश्चित झाले असून यष्टिरक्षकाच्या भूमिकेसाठी रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. जडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडला असल्याने डावखुऱया पंतला अंतिम एकादशमध्ये, फिनिशर म्हणून मानल्या जात असलेल्या कार्तिकऐवजी जास्त पसंती दिली जाईल, अशी शक्यता आहे. आशिया चषकमध्ये कार्तिकला खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही, त्यामुळे या दोन मालिकांत खेळण्याची पुरेशी संधी मिळेल, अशी त्याला आशा वाटते.
दीपक हुडा आशिया चषकातील सर्व सुपर फोर सामने खेळला. मात्र त्याची संघातील भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. जडेजाच्या दुखापतीमुळे गोलंदाजीतील समतोल काहीसा ढळला आहे. सहा ऐवजी पाच गोलंदाजांना घेऊन त्या स्पर्धेत खेळावे लागले होते. जर हा&िर्दक पंडय़ा व जडेजाच्या जागी अक्षर पटेलला खेळविण्यात आले तर भारताला गोलंदाजीचा एक जादा पर्याय मिळेल. अक्षर व चहल हे दोन स्पिनर्स आणि बुमराह, भुवनेश्वर, हर्षल पटेल व हार्दिक हे वेगवान गोलंदाज संघात असतील. विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार असल्याने तेथील वातावरणाचा विचारही व्यवस्थापन करीत आहे.
ऑस्ट्रेलियाने मात्र या मालिकेसाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली असून त्यात डेव्हिड वॉर्नरचाही समावेश आहे. स्टार्क, मिशेल मार्श, स्टोइनिस यांना किरकोळ दुखापती असल्याने त्यांनाही मायदेशात ठेवण्यात आले आहे. या मालिकेत त्यांचे पूर्ण लक्ष केंद्रित असेल ते कर्णधार ऍरोन फिंचवर. अलीकडेच त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून विश्वचषक स्पर्धेआधी फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी तोही प्रयत्नशील असेल. पॉवरहिटर टिम डेव्हिडनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर तो ऑस्ट्रेलियातर्फे पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. जगभरातील विविध लीग्समधून त्याने चमकदार प्रदर्शन करून नाव कमावले असून त्याची पुनरावृत्ती येथे करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
संभाव्य संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, आर.अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर, हर्षल पटेल, दीपक चहर, बुमराह, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया ः ऍरोन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन ऍगर, कमिन्स, टिम डेव्हिड, नाथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, हॅझलवूड, जोश इंग्लिस, मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.
दोन्ही संघांतील काही ठळक आकडेवारी
-2009 ते 2019 या कालावधीत या मैदानावर पाच सामने खेळविण्यात आले. त्यापैकी दुसऱयांदा फलंदाजी करणारे संघ तीनदा तर प्रथम फलंदाजी करणारे संघ दोनदा विजयी झाले.
-भारताने या मैदानावर खेळलेले तीनही टी-20 सामने जिंकले. हे सामने लंका (2009), ऑस्ट्रेलिया (2016) व दक्षिण आफ्रिका (2019) यांच्याविरुद्ध झाले.
-भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजवर 23 टी-20 सामने झाले असून त्यापैकी भारताने 13, ऑस्ट्रेलियाने 9 सामने जिंकले. एक सामन्याचा निकाल लागला नाही.
-पाकने या मैदानावर दोन्ही सामने गमविले. दोन्ही सामने टी-20 वर्ल्ड कपमधील होते.
-येथील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नाबाद 82 धावांची असून कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2016 मध्ये झालेल्या सामन्यात केली होती. कोहलीने याच मैदानावर 2019 मध्ये द.आफ्रिकेविरुद्धही नाबाद 72 धावा फटकावल्या होत्या.
-जेम्स फॉकनरने पाकविरुद्ध (2016) 27 धावांत 5 बळी मिळविले होते. या मैदानावर 5 बळी मिळविणारा तो एकमेव गोलंदाज आहे.
-या दोन संघात झालेल्या मागील सहा सामन्यांपैकी भारताने 3 व ऑस्ट्रेलियाने 2 सामने जिंकले आहेत.
-कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 18 टी-20 सामन्यांत 59.83 च्या सरासरीने व 146.23 च्या स्ट्राईक रेटने 718 धावा जमविल्या असून त्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये नोंदवलेली कोणत्याही फलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
-भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने 15 डावात सर्वाधिक 28 षटकार नोंदवले तर भारतातर्फे कोहलीने 18 डावांत सर्वाधिक 22 षटकार नोंदवले.