वृत्तसंस्था/ ऍडलेड
यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतील तिसरा सामना येथे बुधवारी खेळविला जाणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर पहिले सलग दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी भारतावर मिळवली आहे. या मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला बुधवारच्या सामन्यात विजय मिळवणे जरुरीचे आहे.
भारतीय हॉकी संघाला बचावफळीतील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बचावफळीतील त्रुटी कमी करण्यासाठी भारतीय हॉकीपटूंना बुधवारच्या सामन्यात विशेष लक्ष द्यावे लागेल. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या मानांकनात पाचव्या स्थानावर असलेल्या भारताला बचावफळीतील खेळाडूंची कामगिरी दर्जेदार न झाल्याने पहिले दोन सामने गमवावे लागले. या दोन्ही सामन्यात भारताने सुरुवातीला आघाडी घेऊनही ऑस्ट्रेलियाने भारतीय बचावफळीच्या त्रुटींचा पुरेपूर फायदा घेत आपले विजय नोंदवले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाशी 4-4 अशी बरोबरी साधल्यानंतर शेवटच्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने भारतीय बचावफळी भेदत पाचवा आणि निर्णायक गोल केला. कर्णधार हरमनप्रित सिंगची कामगिरी चांगली झाली होती पण त्यानंतर सामन्याच्या शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने पाठोपाठ गोल नोंदवत दुसरा सामना 7-4 अशा फरकाने जिंकला होता. 13 जानेवारीपासून ओदिशातील भुवनेश्वर आणि रुरुकेला येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेपूर्वी सरावासाठी ही कसोटी मालिका आयोजित केली आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेला 13 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक चढायावर अधिक भर देताना वेगवान खेळ केला. या दोन्ही सामन्यात एकूण 20 गोल नोंदवले गेल्याने उभय संघांच्या खेळाच्या वेगाची कल्पना येईल. बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-0 असा दणदणीत पराभव करून सुवर्णपदक मिळवले होते. या स्पर्धेनंतर उभय संघात या कसोटी मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच गाठ पडत आहे. भारतीय संघातील नवोदित हॉकीपटू मोहमद रहील आणि सुखजित यांची पहिल्या दोन सामन्यातील कामगिरी संघ दडपणाखाली असताना निश्चितच चांगली झाली आहे.