डब्ल्यूटीसीमध्ये स्थान मजबूत करण्यावर भारताचे लक्ष, बांगलादेशलाही संधीबद्दल विश्वास
वृत्तसंस्था/ मिरपूर
भारत व यजमान बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून येथे सुरू होत असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चुरस वाढली असल्याने आपली स्थिती मजबूत करण्यासाठी भारतीय संघ या सामन्यात आक्रमक खेळ करून विजय मिळविण्याचाच प्रयत्न करेल. सकाळी 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल आणि त्याचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरून केले जाईल.
डब्ल्यूटीसी क्रमवारीत अव्वल संघांत चुरस निर्माण झाली असून भारताने त्यात (55.77 टक्के) यशासह दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेला (54.55 टक्के) गब्बा कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून (76.92 टक्के) मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताला बढती मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेनंतर भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारतात होणार असून या मालिकेच्या निकालानंतर भारत सलग दुसऱयांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत स्थान मिळविते का, हे निश्चित होणार आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध भारताला अजिबात गाफील राहून चालणार नाही. नियमित कर्णधार रोहित शर्माला झालेली अंगठय़ाची दुखापत अद्याप पूर्ण बरी झालेली नसल्याने या कसोटीतही केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल आणि संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पहिल्या कसोटीत शुबमन गिल व कुलदीप यांना संधी मिळाली आणि दोघांनीही या संधीचे सोने केले.
रोहित शर्मा या सामन्यासाठी उपलब्ध असता तर शुबमन गिलला वगळणे खूपच अवघड गेले असते. कारण पहिल्या कसोटीत त्याने पहिले कसोटी शतक नोंदवले. पण ती परिस्थिती सध्यातरी निर्माण झाली नसल्याने गिल पुन्हा एकदा संधीचे सोने करण्यास उत्सुक असेल. कर्णधार राहुल पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात अपयशी ठरला. त्याची भरपाई करण्यास तोही निश्चितच प्रयत्न करेल. चत्तोग्रामप्रमाणे येथील खेळपट्टीही संथ आणि फलंदाजांसाठी उपयुक्त ठरणारी असल्याने त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न राहुल करेल.
इंग्लंडमधील एकमेव कसोटीत पुनरागमन करणाऱया चेतेश्वर पुजाराने पहिल्या कसोटीत 90 व 130 चेंडूत नाबाद 102 धावा जमवित नंबर तीनची जागा पक्की केलीय, असे म्हणणे गैर ठरणार नाही. नेहमी सावध व संयमी खेळणाऱया पुजाराने शतकी खेळी करताना आक्रमकतेचे प्रदर्शन केले होते. दुसऱया डावात जलद खेळण्याची गरज असताना त्याने फटकेबाजी केल्याचे पाहून सर्वांना खूप बरे वाटले. याशिवाय स्टार फलंदाज विराट कोहलीलाही कसोटी शतकाचा दुष्काळ संपवण्याची संधी मिळाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने शेवटचे शतक नोंदवले होते.
पहिल्या कसोटीच्या दुसऱया डावात भारताने प्रतिषटक चार धावांच्या गतीने धावा जमविल्या. आता हा सकारात्मक ऍप्रोच त्यावेळची गरज म्हणून ठेवला होता की, भविष्यातील खेळाचे ते सुचिन्ह आहे, हे पहावे लागेल. वातावरण व स्थिती पाहता वेगवान किंवा फिरकी गोलंदाज असो, ते यष्टीच्या रोखानेच गोलंदाजी करण्याची जास्त शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीनंतर कुलदीप पहिली कसोटी खेळला असून 8 बळी मिळवित त्याने आपली उपयुक्तता व कौशल्य पहिल्या सामन्यात दाखवून दिली आहे. आर. अश्विन व अक्षर पटेल या स्पिनर्सच्या तुलनेत त्याने दुसऱया डावात कमी गोलंदाजी केली, तरीही हा मनगटी स्पिनर 3 बळी मिळविण्यात यशस्वी ठरला. फिरकीस अनुकूल परिस्थिती असूनही अश्विनला केवळ एक बळी मिळविता आला होता, त्याची भरपाई तो यावेळी करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱया डावात अक्षर पटेलनेही चार बळी टिपत आपली उपयुक्तता दाखवून दिली. त्याची जलद डावखुरी फिरकी खेळताना फलंदाज झगडताना दिसून आले होते.
पहिल्या कसोटीच्या दुसऱया डावात बांगलादेशने ज्या पद्धतीने प्रतिकार केला, त्यावरून या सामन्यात आपल्यालाही संधी असल्याचा विश्वास त्यांच्यात आला आहे. नवोदित सलामीवीर झाकिर हसनने आपण या स्तरावर खेळण्याच्या योग्यतेचे आहोत, हे शतक नोंदवून दाखवून दिले. लिटॉन दास व मुश्फिकुर रहीय यासारखे वरिष्ठ फलंदाज आपल्या चुकांतून शिकतील आणि मोठी खेळी करतील, अशी अपेक्षा आहे. दुसऱया डावात कर्णधार शकीब अल हसन दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकला नव्हता. त्यामुळेच संघात डावखुरा स्पिनर नसुम अहमदचा समावेश केला आहे. तो या सामन्यात कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे. याशिवाय माजी कर्णधार मोमिनुल हकलाही या सामन्यात संधी मिळू शकते. त्याचा दर्जा पाहता त्याला निश्चितच या सामन्यात खेळविले जाईल, असे प्रशिक्षक रसेल डॉमिंगो यांनी सांगितले.
संभाव्य संघ ः भारत ः केएल राहुल (कर्णधार), पुजारा (उपकर्णधार), कोहली, श्रेयस अय्यर, पंत, केएस भरत, अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, सिराज, उमेश यादव, अभिमन्यू ईश्वरन, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
बांगलादेश ः शकीब हसन (कर्णधार), मेहमुदुल हसन जॉय, नजमुल हुसेन शांतो, मोमिनुल हक, यासिर अली, मुश्फिकुर रहीम, लिटॉन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, तस्किन अहमद, खलीद अहमद, झाकिर हसन, रेजौर रेहमान राजा.
सामन्याची वेळ ः सकाळी 9 वाजता
थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क.
केएल राहुलला दुखापत?
फलंदाजीच्या सरावावेळी हंगामी कर्णधार केएल राहुलच्या हाताला चेंडू लागल्याने तो जखमी झाला. मात्र ही गंभीर दुखापत नसून सकाळपर्यंत तो ठीक होईल, असे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले. चेंडू हाताला लागला त्या ठिकाणी तो हलका मसाज करताना दिसला. डॉक्टरांनीही ताबडतोब धाव घेत त्याची तपासणी केली. किरकोळ दुखापत असल्याने तो या सामन्यात खेळेल, असे सांगण्यात आले. मात्र तो खेळू न शकल्यास चेतेश्वर पुजारा संघाचे नेतृत्व करेल आणि सलामीला अभिमन्यू ईश्वरनला संधी दिली जाईल, असे राठोर म्हणाले.