वृत्तसंस्था/ कोलंबो
17 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेत सोमवारी भारत आणि बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कोलंबोच्या रेसकोर्स आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता प्रारंभ होईल.
या स्पर्धेतमध्ये भारतीय फुटबॉल संघाला यापूर्वीच्या सामन्यात नेपाळकडून अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवामुळे भारतीय फुटबॉल संघाला सोमवारच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दर्जेदार खेळ करावाच लागेल. मागील पराभव विसरून आता पुन्हा नव्या आत्मविश्वासाने सोमवारच्या सामन्यात चांगली कामगिरी कशी करता येईल, याकडे भारतीय संघातील खेळाडूंनी आपले लक्ष केंद्रीत करणे जरुरीचे आहे असे संघाचे प्रमुख प्रशिक्षक बी. फर्नांडिस यांनी म्हटले आहे. या स्पर्धेत नेपाळ संघाकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला असला तरी भारताने अ गटातील पाठोपाठच्या सामन्यात अनुक्रमे लंका आणि मालदीव यांना पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. बांगलादेशचा संघ दर्जेदार असून या संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ कदापि करणार नाही असेही ते म्हणाले.