माजी गव्हर्नर डि. सुब्बाराव यांचा विश्वास ः 2029 पर्यंत ध्येय साध्य होणार
वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारत वर्ष 2028-29 या कालावधीपर्यंत पाच ट्रिलियन (पाच हजार अब्ज) डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकेल तसेच आगामी पाच वर्षांमध्ये जीडीपी वाढीचा दर हा 9 टक्क्यांच्या प्रमाणात वाढत जाणार असल्याचा दावाही भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर ‘फेडरेशन ऑफ तेलंगणा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज ऑन इंडिया ऍट द रेट ऑफ 75 मार्चिंग टुवर्डस् 5 ट्रिलियन इकॉनॉमी’ या विषयावर बोलताना माजी गर्व्हनर सुब्बाराव यांनी भारतासाठी 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था प्राप्त करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला परंतु यासाठी भारताला मुख्य आठ आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
सुब्बाराव पुढे म्हणाले, की काही राज्ये सरकारच्या अनुदानाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. जादा अर्थसंकल्पीय तरतूद नसल्यामुळे असे होऊ शकते, हे साऱयांनीच लक्षात घ्यायला हवे. मोफत वाटण्याच्या योजनांबाबत आगामी दक्ष राहणे गरजेचे असून भविष्यातील पिढीवर अकारण कर्जाचा भार राहणार नाही यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2028-29 पूर्वीच्या कल्पनेनुसार भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनू शकते. यासाठी आपल्याला पुढील 5 वर्षांसाठी 9 टक्के शाश्वत वार्षिक जीडीपी वाढीचा दर गाठावा लागेल.
पाच ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला आठ मोठी आव्हाने दिसत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. सुब्बराव यांच्या मते, आव्हानांमध्ये गुंतवणूक वाढवणे, उत्पादकता सुधारणे, शिक्षण आणि आरोग्य परिणाम, रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता वाढवणे, आर्थिक स्थिरता राखणे, जागतिक मेगा ट्रेंडचे व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारणे यांचा समावेश राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.