वृत्तसंस्था/ दोहा
भारताच्या यू-17 पुरुषांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने येथे झालेल्या दुसऱया मित्रत्वाच्या सामन्यात यजमान कतारच्या युवा संघाचा पराभव केला. पहिल्या सामन्यात कतारने भारताचा पराभव केला होता.
या विजयामुळे याच वर्षी होणाऱया एएफसी यू-17 आशियाई चषक अंतिम फेरीसाठी भारतीय संघ पात्र ठरला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठीच या दोन मैत्रिपूर्ण आयोजन करण्यात आले होते. कतारने शनिवारी पहिला सामना 3-1 अशा फरकाने जिंकला होता. दुसऱया सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच कतारला बॅकफूटवर ठेवले होते. भारताने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखत 3-0 अशा गोलफरकाने विजय मिळविला. बिबियानो फर्नांडिसच्या या संघाने 10 व्या मिनिटा खाते उघडले. कतारचा गोलरक्षक झीयाद शोएबने पेनल्टी क्षेत्रात बॅकपास हाताळल्याने भारताला इनडायरेक्ट फ्री किक मिळाली. त्याववर डिफेंडर रिकी मीतेई हाओबमने हा गोल नोंदवला.
आघाडी घेतल्यानंतरही भारताने आक्रमण चालूच ठेवत कतारवर दडपण आणले. डॅनी लैशरामने ही आघाडी वाढविलीच होती. 18 यार्ड बॉक्सजवळून त्याने मारलेली फ्री किक गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली. पण पुढच्या कॉर्नरवर भारताने यश मिळविले. गुरनाज सिंग ग्रेवालने कर्णधार कोरू सिंग थिंगुजमकडे क्रॉस पुरविला. पण त्याचा फटका गोलरक्षक शोएबने अचूक थोपविला. मात्र रिबाऊंड झालेला चेंडू शाश्वत पन्वरच्या पुढय़ात पडला. तो त्याने टॅप करीत गोलजाळय़ात मारला. पन्वरचा हा दुसऱया सामन्यातील दुसरा गोल होता.
दुसऱया सत्रात गोलपोस्टजवळ फारशी ऍक्शन पहावयास मिळाली नाही. मात्र भारताकडे काही संधी मिळाल्या होत्या. डॅनीचा एक फटका अडविला गेला तर पन्वरने मारलेला फटका वाईड गेला. भारतीय गोलरक्षक साहिलला फक्त एकदाच 71 व्या मिनिटाला काम लागले. त्यावर त्याने अप्रतिम बचाव केला. शेवटच्या 15 मिनिटा प्रशिक्षक फर्नांडिस यांनी काही बदल केले. शेवटी कोरूने इंज्युरी टाईममध्ये तिसरा गोल नोंदवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.