मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन; जागतिक व्याघ्रदिन कोल्हापुरात साजरा
कोल्हापूर प्रतिनिधी
वाघ हा अम्ब्रेला स्पेसिस म्हणजेच जंगल या परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. वाघांमुळेच अरण्य सुरक्षित राहतो आणि अरण्यामुळे व्याघ्रादी पशु सुरक्षित राहतात सद्यःस्थितीत प्रोजेक्ट टायगर प्रकल्पातर्गंत केलेल्या कामामुळे जगातील सर्वाधिक वाघ भारतात आहेत, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन यांनी दिली. नामशेष होण्याच्या जवळपास पोहोचलेला वाघ जतन करण्यासाठी शासन, वनविभाग आणि पर्यावरणवादी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य यांनीही सहभाग घेतला पाहिजे. वाघांच्या जतन, संवर्धनाबरोबरच चोरट्य़ा शिकारीपासून संरक्षणासाठी व्यापक जनजागृती मोहिमेची गरज असल्याचेही रामानुजन यांनी सांगितले.
सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प व शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक व्याघ्र दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मुख्यवनसंरक्षक रामानुजन यांनी व्याघ्रदिनाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांसमोर विशद केली.
रामानुजन म्हणाले, अनिर्बंध शिकार, तस्करी आणि वाघाच्या नैसर्गिक अधिवासावरील झालेले अतिक्रमण यामुळे जगातील नऊ पैकी तीन प्रजाती लुप्त झाल्या आहेत. शिल्लक प्रजातीतील वाघांची संख्या झपाटय़ाने रोडावत चालल्यामुळे रशियातील सेंट पीटर्सबर्ग मध्ये 2010 साली वाघांविषयी शिखर परिषदेत जागतिक व्याघ्र दिनाची घोषणा करण्यात आली. या दिनाच्या माध्यमातून वाघांच्या संरक्षणाबरोबर जतन आणि संवर्धनविषयी जनजागृती आणि कृती सुरू आहे. त्यामध्ये जनतेचाही सहभाग महत्वाचा आहे.
या कार्यक्रमासाठी मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक अमोल कुलकर्णी यांनी नियोजन केले. पर्यावरण शास्त्र विभागाचे समन्वयक श्रीकांत भोसले यांनी स्वागत केले केले डॉ. पी.सी भास्कर, उदय पाटील, प्रवीण सावंत, प्रवीण सावंत, भक्ती कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. संचालक डॉ. आर. के. कामत यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, व्याघ्रदिनाचे औचित्य साधनून कोल्हापूर जिह्यातील विविध प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये वाघांविषयी जनजागृती निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.