वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी टी-20 विश्वचषक अंधांच्या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद यजमान भारताने सलग तिसऱयांदा पटकाविले. बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी दणदणीत पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघ अपराजीत राहिला आहे. भारतीय संघातील सुनिल रमेशला ‘सामनावीर’ तसेच बी 3 गटात ‘मालिकावीर’ असे दोन्ही पुरस्कार मिळाले. कर्णधार अजयकुमार रेड्डीला बी 2 गटात मालिकावीर तसेच बांगलादेशच्या मोहम्मद रशिदला बी 1 गटात मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 2 बाद 277 धावा जमाविल्या. सुनिल रमेशने नाबाद 136 तर अजयकुमार रेड्डीने नाबाद 100 धावा फटकाविल्या. सुनिल रमेशने आपल्या नाबाद शतकामध्ये 1 षटकार आणि 24 चौकार तर कर्णधार अजयकुमार रेड्डीने 50 चेंडूत नाबाद शतक झळकाविताना 18 चौकार ठोकले. बांगलादेशतर्फे सलमानने 41 धावात 2 गडी बाद केले.
त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 3 बाद 157 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 120 धावांनी गमवावा लागला. बांगलादेशच्या डावात सलमानने नाबाद 77 तर आरिफ ऊल्लाने 22, रेहमानने 21, तर अबिदने 18 धावा केल्या. भारतातर्फे ललित मिना आणि अजयकुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.