अमेरिकेच्या अध्यक्षांशी घेतली भेट
@ टोकिओ / वृत्तसंस्था
भारत-प्रशांत क्षेत्र सर्वांसाठी मुक्त रहावे, यासाठी भारत आणि जपान एकत्रितरित्या प्रयत्न करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांचा दोन दिवसांच्या जपान दौरा सुरु झाला असून आज मंगळवारी ते अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्याशी थेट चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांनी चीनच्या वर्चस्ववादाला पायबंद घालण्यासाठी एकत्रितरित्या काम करण्याचा निर्धार केला आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.
इंडो पॅसिफिक पेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी (भारत-प्रशांतीय आर्थिक उन्नती कार्यक्रम) या कार्यक्रमाची योजना अमेरिकेने केली आहे. यामध्ये प्रशांत महासागर आणि दक्षिण चीन समुद्राशी संलग्न 12 देशांचा समावेश आहे. अमेरिका आणि भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, सिंगापूर, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपाईन्स, थायलंड आणि व्हिएतनाम हे देश एकत्र येऊन ही योजना साकारणार आहेत. भारताने यात शक्य ते सर्व योगदान देण्याचा निर्धार केला आहे. मंगळवारी बायडन यांच्याशी यासंदर्भात, तसेच युक्रेनच्या संबंधात पंतप्रधान मोदी यांची थेट आणि मनमोकळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
क्वाड बैठकीसह कार्यक्रमांची रेलचेल
क्वाडच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी जपानच्या दौऱयावर आहेत. सोमवारी पहाटे ते जपानची राजधानी टोकिओ येथे पोहचले. तेथे त्यांचे शानदार स्वागत करण्यात आले. दिवसभर त्यांनी येथे अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. जपानमधील भारतीयांनाही ते भेटले. येथील भारतीयांनी त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी जोशपूर्ण भाषण केले.
प्रशांतीय क्षेत्र सर्वांसाठी
प्रशांत महासागरीय क्षेत्रावर कोणत्याही एका शक्तीचे वर्चस्व असू नये. हे क्षेत्र सर्वांसाठी मुक्त आणि व्यापारासाठी सुरळीत असावे हे भारत आणि जपानचे ध्येय असून दोन्ही देश क्वाडच्या माध्यमातून या ध्येयाशी निगडीत राहतील. त्याचप्रमाणे सागरी संपर्काची सुरक्षितता वाढावी यासाठीही दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. दोन्ही देशांमधील परस्पर व्यापार आणि तंत्रज्ञानाचे आदानप्रदान गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढले असून भविष्यकाळात संबंध आणखी दृढमूल होतील. भारत आणि क्वाडचे इतर सदस्य देश आर्थिक उन्नतीसाठी पुढाकार घेत आहेत. भारताही या प्रयत्नांमध्ये महत्वाचे योगदान करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जपान भारताचा भरवशाचा मित्र
गेल्या अनेक दशकांपासून जपान भारताचा अत्यंत भरवशाचा मित्रदेश राहिला आहे. जपानने भारताच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. सध्याच्या कोरोना नंतरच्या काळात दोन्ही देश आर्थिकदृष्टय़ा अधिक जवळ येत असून एकमेकांना सहाय्यभूत ठरत आहेत. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था कात टाकत असून व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक आदान-प्रदान वाढविले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने जी धोरणे आखली आहेत, त्यामुळे देश जागतिक उत्पादनाचे केंद्र बनत चालला आहे. भारतातील या बदलत्या वातावरणाचा लाभ जागतिक गुंतवणूकदारांनी घ्यावा. जपानचे गुंतवणूकदारही यात आघाडीवर राहतील अशी भारताची अपेक्षा आहे, अशी मांडणी त्यांनी ऑप-एड वरील संदेशात केली.
बॉक्स
जय श्रीरामच्या घोषणांनी स्वागत
सोमवारी दुपारी पंतप्रधान मोदी यांनी जपानमधील भारतीय वंशाच्या नागरीकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमासाठी हजारो भारतीयांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी यांचे स्वागत ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचा आत्मविश्वास वाढला असून जगात भारताची मान उंचावली आहे, असे मत अनेक उपस्थितांनी व्यक्त केले.
बॉक्स
आम्ही नैसर्गिक मित्र
भारत आणि जपान यांच्यातील संबंध अनेक शतकांपासूनचे आहेत. गौतम बुद्धाने भारतात स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार जपानमध्ये झाला. आज आपल्या सर्वांनाच बुद्धाने दाखविलेल्या मार्गाने जावे लागणार आहे. मानवतेला वाचविण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. जपानमधील भारतीयांनी जपानच्या नागरिकांना भारताची भारताची माहिती करुन द्यावी. तसेच भारताला भेट देण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना काळात अत्यंत कमी वेळात भारताने स्वदेशी लसीची निर्मिती केली आणि कोटय़वधी लोकांचे लसीकरण केले असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.