एससीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन, अनुभवाचे प्रदान करण्यास तयार
समरकंद / वृत्तसंस्था
भारतात आज 70 हजार स्टार्टअप्स आणि 100 हून अधिक युनिकॉर्न कंपन्या असून भारत या ख्याती मिळवून आहे. या क्षेत्रातील आपला अनुभव इतर देशांना वाटण्यास तयार आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) परिषदेत भाषण करताना काढले. उझबेकिस्तानमधील शहर समरकंद येथे या परिषदेची पहिली फेरी पार पडली.
गेली दोन वर्षे जगासाठी कठीण गेली. प्रथम कोरोनाचा उद्रेक आणि नंतर रशिया-युपेन युद्ध या दोन घटना घडल्या. कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली, तर युद्धामुळे जगातील पुरवठा साखळय़ा तुटल्या. यामुळे अन्नधान्ये आणि खाद्यतेलांची टंचाई निर्माण झाली. अशा स्थितीत आपल्याला आता पुरवठा साखळय़ा पुन्हा निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगाने पावले टाकावयास हवीत. तसेच जगाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल हे सुनिश्चित करावे अशी सूचना त्यांनी केली.
भारताची कामगिरी स्पृहणीय
कोरोना काळातही भारताने भरीव आर्थिक विकास दर साध्य केला. आज आमच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 7.5 टक्के इतका राहील अशी आशा आहे. आमच अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे हे सांगण्यात मला अतिशय आनंद होत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
तंत्रज्ञानविकासावर भर
भारताचा तंत्रज्ञान विकासावर भर आहे. भारताची युवा कर्मशक्ती भारताला जगाच्या स्पर्धेत उतरवू पहात आहे. भारताला उच्च तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तंत्रज्ञानाच्या सकारात्मक आणि उचित उपयोगासंबंधातही आम्ही सजग आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
धान्यशेती महत्वाची
जागतिक लोकसंख्येची अन्नसुरक्षा हे सर्वात महत्वाचे आव्हान आज जगासमोर आहे. यासाठी पांरपरिक धान्यांची (मिलेटस्) लागवड मोठय़ा प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. जगात हजारो वर्षांपासून जी तृणधान्ये उत्पादित केली जातात त्यांच्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. 2023 हे वर्ष ‘इयर ऑफ मिलेट्स’ म्हणून मानले जावे, अशी भारताची सूचना आहे. तसेच भारत हे जागतिक वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध होत आहे. गुजरातमध्ये आम्ही जागतिक पारंपरिक औषध केंद्र स्थापन केले आहे. या संदर्भात एससीओ देशांशी आम्ही सहयोग वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली.
जिनपिंग यांच्याशी हस्तांदोलन नाही
नेत्यांच्या एकत्र छायाचित्रात पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या शेजारीच उभे होते. तथापी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही किंवा एकमेकांकडे पाहून स्मितहास्यही केले नाही. हा मीडियावर चर्चेचा विषय राहिला. गेली दोन वर्षे भारत आणि चीनमध्ये लडाख सीमेवरुन तणावाचे वातावरण आहे. त्याची झलक या छायाचित्रातही स्पष्टपणे दिसून येत होती.
हे युग युद्धाचे नाही !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाली. या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी अन्नसुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. हे युग युद्धाचे नाही, असे त्यांनी पुतीन यांना स्पष्टपणे बजावले. पुतीन यांनीही त्यांना ‘रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध लवकर संपावे’ अशीच आमची इच्छा आहे, असे स्पष्ट केले. जगाच्या अन्नसमस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष पुतीन यांना केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींशी चर्चा
तुर्कस्थानचे राष्ट्रपती रजब ताईब एर्दोगन यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांनी साधारणतः अर्धा तास द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. दोन्ही देशांमधील परस्पर व्यापारात वाढ आणि गुंतवणूक वाढविण्याच्या मुद्दय़ांवर चर्चेत भर होता. महत्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांवरही त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
पाकिस्तानी पंतप्रधानांना इयरफोनचा त्रास
पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांना पुतीन यांच्याशी चर्चा करत असताना इयरफोन नीट बसविता येत नव्हता. ते पाहून रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना हसू आवरत नव्हते. या घटनेचे व्हिडीओ चित्रण हा चर्चेचा विषय बनला. शरीफ मुद्दामच कानाला इयरफोन नीट बसवत नव्हते, कारण आपण रशियाच्या फार जवळ आहोत असे त्यांना दाखवाचे नव्हते, अशीही चर्चा होती.
पहिला दिवस भेटी-भाषणांचा
ड एससीओच्या पहिल्या दिवशी भाषणे आणि नेत्यांच्या परस्पर भेटी
ड अन्न सुरक्षा आणि पुरवठा साखळय़ा यांच्यावरच नेत्यांचा मुख्य भर
ड युद्ध थांबविणे जगाच्या हिताचे ः पंतप्रधान मोदींचे पुतीनना सांगणे
ड चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्याशी पंतप्रधान मोदींचे हस्तांदोलन नाही