ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात महागाई गगणाला भिडली आहे. भाजप सरकार जनतेला रोजगार देऊ शकत नाही. सरकारी कंपन्याही विकल्या जात आहेत. जनतेला देण्यासाठी सरकारकडे काहीच उरलं नाही. गरिबीच्या बाबतीत भारत हा पाकिस्तान, बांग्लादेश आणि नेपाळच्याही मागे आहे, असे जम्मू-काश्मीरमधील पीडीपी नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.
मुफ्ती म्हणाल्या, महागाई, रोजगार यासारख्या मुद्यांवरुन जनतेचे लक्ष्य विचलित करण्यासाठी लोकांना मुस्लिमांच्या मागे लावले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ताजमहालबाबतही चर्चा सुरू आहे. ताजमहालमधील अनेक खोल्या उघडण्याची मागणी होत असून, त्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. आता मोगलांच्या काळातील मशिदी आणि ताजमहालच्या मागे पडून काही साध्य होणार नाही. सत्ता असेल तर लाल किल्ला आणि ताजमहालला देऊळ बनवा, मग या देशात त्यांना पाहण्यासाठी किती लोक येतील ते पाहूया.
गेल्या काही दिवसांपासून बुलडोझरची कारवाई, लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसा वाद, भाषेचा वाद किंवा ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचे प्रकरण असो, आता ताजमहाल आणि कुतूब मिनार असे काही मुद्दे देशात विनाकारण चर्चेत आणले गेले. ज्याविषयी राजकीय खलबते वेगाने होत आहे आणि लोकांचे लक्ष विचलित होत आहे.