जपानचे पंतप्रधान भारत दौऱयावर ः नव्या हिंद-प्रशांत योजनेवर होणार चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत-जपान संबंधांना नवा आयाम प्राप्त होणार आहे. जपानचे पंतप्रधान किशिदा फुमियो हे आज भारताच्या दौऱयावर येणार असून दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. भारत-जपानदरम्यान वार्षिक शिखर परिषद आयोजित होत आहे. फुमियो हे दोन दिवसीय भारत दौऱयावर येत आहेत.
सुषमा स्वराज भवनात आयोजित 41 व्या व्याख्यानमालेत फुमियो हे सोमवारी भाग घेणार आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेयर्सकडून आयोजित या व्याख्यानमालेत पंतप्रधान फुमियो हे जगासमोर नव्या हिंद-प्रशांत योजनेची रुपरेषा मांडणार असल्याचे मानले जात आहे. या योजनेत भारत-जपानच्या मैत्रीला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाणार आहे. क्षेत्रीय शांतता कायम राखण्यासाठी स्वतंत्र आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राशी निगडित ही योजना असणार आहे.
नव्या हिंद-प्रशांत योजनेचा मुख्य उद्देश पूर्ण क्षेत्रातील चीनचा वाढता प्रभाव आणि विस्तारवादी भूमिकेला संतुलित करणे आहे. तसेच क्षेत्रात विकसनशील देशांचा विकास आणि संरक्षण सहकार्य वाढविण्याचा पर्याय उपलब्ध करण्यावर भर असणार आहे. मागील वर्षी सिंगापूरमध्ये संगरी ला डायलॉगमध्ये फुमियो यांनी पहिल्यांदा हिंद-प्रशांत योजनेचा उल्लेख केला होता.
जपानसोबत भारताचे संबंध अत्यंत मधूर राहिले आहेत. फुमियो आणि नरेंद्र मोदी यांच्यात नव्या हिंद-प्रशांत योजनेवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. जपानच्या या पुढाकारात भारताचे सहकार्य आणखी वाढावे अशी त्यांची इच्छा आहे. जपान सध्या जी-7 चे अध्यक्षत्व सांभाळत आहे. तर भारताकडे जी-20 च्या अध्यक्षत्वाची जबाबदारी आहे.
सद्यकाळात जग मागील एक वर्षापासून रशिया-युक्रेन युद्धाच्या प्रभावांना सामोरे जात आहे. जपान जी-7 च्या अन्य देशांसोबत मिळून रशियावरील आर्थिक निर्बंध वाढवत आहे. तर भारत रशियाविरोधात कुठल्याही कारवाईत सामील होणे टाळत आहे. क्वाड या समुहात जपान अन् अमेरिकेसोबत ऑस्ट्रेलिया तसेच भारताचा सहभाग आहे.
सागरी सहकार्य वाढविण्यावर भर
हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत आणि जपानच्या भागीदारीत सागरी सुरक्षा हा महत्त्वाचा पैलू आहे. सागरी सुरक्षेतील सहकार्य वाढविण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो यांच्यात चर्चा होणार आहे. दोन्ही देशांच्या व्यापाराचा 90 टक्के हिस्सा हिंद-प्रशांत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय मार्गाद्वारे होत असतो. 2013-14 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 16.31 अब्ज डॉलर्स इतका राहिला होता. तर 2021-22 दरम्यान द्विपक्षीय व्यापार 20.57 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. जपानची भारतातील गुंतवणूक वेगाने वाढत आहे. 2021 मध्ये जपानकडून 410 अब्ज येन इतकी प्रचंड गुंतवणूक करण्यात आली आहे.