ऑनलाईन टीम/तरुण भारत
जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने बळीराजा सुखावला असून पेरणीची कामेही आता जवळपास आटोपली आहे. अशातच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अलर्ट जरी केला आहे. येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यातील रत्नागिरी, सातारा, पुणे शहरांना रेड अलर्ट तर कोल्हापूरला यलो अलर्ट जरी केला असून बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात आठवडाभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर आज पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पण सध्या थांबलेला हा पाऊस पुन्हा जोरदार कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून पुढच्या २४ तासांसाठी मुंबई, रत्नागिरी, सातारा, पुणे शहरांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, १२ जुलै पर्यंत कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. ०९ आणि ११ जुलैला सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट आणि ०९, ११ आणि १२ जुलैला पुण्याला रेड अलर्ट दिला आहे.
हे ही वाचा : Kolhapur; राधानगरी धरणात 40 टक्के पाणीसाठा
दरम्यान, सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये परिस्थिती अशीच असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. शुक्रवारी पालघर, ठाण्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुससळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही शुक्रवारी रेड अलर्ट आहे.