राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे उद्गार, मडगावात स्वामी विवेकानंद जयंती
प्रतिनिधी / फातोर्डा
भारताला गतवैभव प्राप्त होऊन पुन्हा एकदा तो विश्वगुरू बनावा आणि आपला देश त्यादृष्टीने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मडगाव रवींद्र भवनच्या स्वामी विवेकानंद केंद्रात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले. रवींद्र भवन, मडगाव येथील स्वामी विवेकानंद केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी व्यासपीठावर मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, रवींद्र भवनचे सदस्य सचिव आग्नेलो फर्नांडिस उपस्थित होते. पुढे बोलताना राज्यपाल पिल्लई म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ज्या मडगावात त्यांचे वास्तव्य होते त्या शहरात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद यांचे तत्त्वज्ञान युवकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.
आमदार दिगंबर कामत म्हणाले की, स्वामी विवेकानंदांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केली जाते. कारण त्यांनी युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले आणि त्यांना दिशा दाखवली. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की, मेंदू आणि हृदय यामध्ये जर संभ्रम, गोंधळ असेल तर आपण नेहमी आपल्या हृदयाचे ऐकावे. त्यामुळे अवघड असा प्रश्नही पटकन सुटतो. त्यांचा हा सल्ला ऐकावा आणि कितीही हुशार असलो, तरी आपल्या हृदयाचे ऐकून समस्या सोडवावी, असे त्यांनी सांगितले. रवींद्र भवनमध्ये दामोदर नाईक यांनी स्थापन केलेल्या या केंद्रातर्फे विविध कार्यक्रम घडवून आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.
2021 मध्ये या केंद्राची स्थापना रवींद्र भवनमध्ये माझ्या कारकिर्दीत झाली. युवावर्गामध्ये जागृती होण्यासाठी या केंद्रात कार्यक्रम व्हायला हवेत असे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे आहे. उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी जगाला दिशा दाखवली. स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मडगाव शहर आहे. स्वामी विवेकानंद यांनी ‘उठा, जागे व्हा, पुढे चला’ हा संदेश युवकांना दिला. त्यांचा हा संदेश युवकांनी आचरणात आणून देश घडवावा, असे दामोदर नाईक म्हणाले
आमदार उल्हास तुयेकर म्हणाले की, स्वामी विवेकानंद भारतात जन्माला आले हे आमचे भाग्य आहे. त्यांनी आपल्या विचारांतून देशालाच नव्हे, तर विदेशातही सर्वांना प्रभावित केले. त्यांचे विचार जर अंमलात आणले, तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले. रवींद्र भवनचे सदस्य सचिव आग्नेल फर्नांडिस यांनी स्वागत, तर सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले. पूनम बुधाळकर यांनी आभार मानले.