आजच्या निकालावरून गटातील अव्वल दोन संघ निश्चित होणार
वृत्तसंस्था/ मेलबर्न
भारत व झिम्बाब्वे यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीचा शेवटचा सामना आज (रविवारी) येथे होत असून हा सामना जिंकल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. त्याआधी द.आफ्रिका-नेदरलँड्स (पहाटे 5.30) व पाकिस्तान-बांगलादेश (सकाळी 9.3) यांचे सामने होणार आहेत.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा चांगले फटके मारत आहे. पण नेदरलँड्साविरुद्ध एक अर्धशतक वगळता त्याच्याकडून अद्याप मोठी खेळी झालेली नाही. या सामन्यात ती कसर तो भरून काढण्याची अपेक्षा केली जात आहे. बरोबर दोन आठवडय़ापूर्वी याच एमसीजी मैदानावर भारत व पाक यांच्यातील एपिक लढत व विराट कोहलीची एक संस्मरणीय खेळी पहावयास मिळाली होती. झिम्बाब्वेविरुद्धची ही लढतही भारतासाठी महत्त्वाची असून विजय मिळवित पुढचा मार्ग मोकळा करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. विजयानंतर गट 2 मध्ये भारत 8 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचेल. भारताने पहिले स्थान मिळविल्यास गट 1 मधील दुसरे स्थान मिळविणाऱया इंग्लंडविरुद्ध भारताची उपांत्य लढत होईल.
रेगिस चकबवाच्या झिम्बाब्वे संघाने सुरुवातीला चांगले प्रदर्शन केले. पण नंतर ते ढेपाळत गेले. त्यांच्या फलंदाजांनी अद्याप अपेक्षित चमक दाखवलेली नाही. भारताचे आक्रमण पाहता या सामन्यातही त्यांना मोठी खेळी करता येणे कठीण जाऊ शकते. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग व मोहम्मद शमी बहरात असल्याने त्यांना सामोरे जात मोठी धावसंख्या उभारणे त्यांना अवघड जाऊ शकते. फक्त ऑफस्पिनर आर. अश्विनकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. तो नियंत्रित मारा करतो, पण त्याच्याकडून असामान्य कामगिरी झालेली नाही.
सिकंदर रझा अडथळा ठरणार?
भारताने फलंदाजांच्या क्रमवारीत फारसा बदल केलेला नाही. मात्र द.आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असल्याने अक्षर पटेलला वगळण्यात आले होते. झिम्बाब्वे संघात क्रेग एर्विन, सीन एर्विन, रेयान बर्ल व सीन विल्यम्स झिम्बाब्वे बॅटिंग लाईनअपमध्ये असल्याने भारतीय व्यवस्थापन दीपक हुडाला पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार करू शकते. मात्र सिकंदर रझा हा भारतासाठी सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. या मोसमात त्याने स्वप्नवत प्रदर्शन केले असून स्पर्धेचा शेवट गोड करण्यासाठी त्याचाही प्रयत्न असेल. हर्षल पटेल हा आणखी एक पर्याय भारताकडे आहे. त्याच्यामुळे तळाची फलंदाजी थोडीफार भक्कम होईल.
यजुवेंद्र चहलला या स्पर्धेत अद्याप एकदाही संधी देण्यात आलेली नाही. भारताचे शेपूट आणखी लांब होऊ नये, यासाठी त्याला स्थान देण्याचे टाळण्यात आले आहे. असे असले तरी इंग्लंडविरुद्ध त्याचे रेकॉर्ड चांगले असल्याने त्याला कदाचित उपांत्य फेरीत अंतिम संघात संधी दिली जाऊ शकते.
भारत-झिम्बाब्वे पहिल्यांदाच आमनेसामने
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत व झिम्बाब्वे यांच्यात अद्याप एकदाही लढत झालेली नाही. मात्र झिम्बाब्वेचा दौरा केला असल्याने त्या अनुभवाच्या जोरावर भारतीय व्यवस्थापन डावपेच आखण्याची अपेक्षा आहे. या दौऱयात वनडे मालिका झाली असली आणि भारतीय टी-20 संघातील प्रमुख खेळाडूंचा त्यात सहभाग नसला तरी झिम्बाब्वे संघात त्या मालिकेत खेळलेलेच अधिक खेळाडू आहेत. नेदरलँड्सविरुद्ध त्यांनी विजय मिळविला असता तर त्यांनाही उपांत्य फेरीची अल्प संधी मिळू शकली असती. झिम्बाब्वेने पाकिस्तानला हरवून त्यांना अडचणीत आणले असून हा पराभवच पाकला खूप महाग पडल्याने ते स्पर्धेबाहेर पडण्याच्या वाटेवर पोहोचले आहेत.
या स्पर्धेत 155 ते 160 ही सरासरी धावसंख्या ठरली आहे. मात्र भारतीय फलंदाज याहून सरस कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. प्रथम फलंदाजी घेतल्यास ते 200 धावांचा टप्पा गाठण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. राहुल व रोहित शर्मा यांनी पॉवरप्लेमध्ये धडाकेबाज सुरुवात करून दिल्यास उपांत्य फेरी गाठण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, कोहली, सूर्यकुमार, हार्दिक पंडय़ा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर.अश्विन, शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल, चहल.
झिम्बाब्वे ः रेगिस चकबवा (कर्णधार), सीन विल्यम्स, सीन एर्विन, क्रेग एर्विन, सिकंदर रझा, तेदाय चतारा, ल्युक जाँग्वे, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधेवेरे, वेलिंग्टन मासाकेझा, टोनी मुनयोंगा, रिचर्ड एन्गरेव्हा, ब्लेसिंग मुझरबानी, मुल्टॉन शुम्बा.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून
..तर पाकला आगेकूच करण्याची संधी मिळू शकते
भारताने ही लढत जिंकल्यास किंवा रद्द झाल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. पण झिम्बाब्वेने विजय मिळविला आणि पाकने बांगलादेशवर मात केली तर सरस नेट रनरेटच्या बळावर पाकला उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते. याशिवाय पाकला आणखी एक प्रकारे शेवटच्या चारमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जर द.आफ्रिका नेदरलँड्सकडून पराभूत झाली (शक्यता कमी) आणि पाकने बांगलादेशवर विजय मिळविला तर पाक बाद फेरीत खेळेल. आणि जर द.आफ्रिकेचा सामना रद्द झाला तर पाक व द.आफ्रिकेचे समान 6 गुण होतील. यावेळी नेट रनरेटच्या आधारे एक संघ पुढे जाईल. सध्या द.आफ्रिकेचे रनरेट पाकपेक्षा सरस आहे. पण रविवारच्या सामन्यानंतर रनरेटची स्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.