पुणे / प्रतिनिधी :
अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांना आफ्रिकेचे महत्त्व समजले आहे आणि म्हणूनच आज अमेरिका ही आफ्रिकन देशांबरोबर शिखर परिषदांचे आयोजन करीत आहे. भारत आणि चीनला जागतिक महासत्ता बनायचे असेल, तर त्यासाठी आफ्रिकेसोबत सर्व क्षेत्रात भागीदारी वाढवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डम्मू रवी सरकार यांनी येथे व्यक्त केली.
सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) तर्फे ‘आंतरराष्ट्रीय संबंध परिषदे’च्या आठव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सिंबायोसिस आंतराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार होते.
डम्मू रवी म्हणाले, भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांचा संघर्ष हा समान होता. तो स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष होता. या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकांवर होणार अन्याय झाला व तो दूर करण्यासाठी आवश्यक न्यायव्यवस्थेची नितान्त आवश्यकता होती. त्या काळात या दोन्ही देशांना अनुक्रमे महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांसारख्या महान व्यक्तींचा सहवास व मार्गदर्शन लाभले. 20 व्या शतकाची व्याख्या मुख्यत्वे आफ्रिकन देशांतील स्वातंत्र्यलढय़ाने केली होती. आता 21 व्या शतकात मात्र आफ्रिकेत बदल झाला आहे आणि हे सर्व आफ्रिकेच्या राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत घडले आहे. आफ्रिकन देश आता संघर्षपूर्ण परिस्थितीत नाहीत.
भारतीय कंपन्यांनी आफ्रिकेत उत्पादन युनिट सुरू केले पाहिजेत, यामुळे त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहारांची व्याप्ती वाढेल. आफ्रिकेत पायाभूत सुविधांचा विस्तार करणे गरजेचे आहे. आपल्या देशातील सिंबायोसिससारख्या प्रगतीशील शैक्षणिक संस्थांसाठी ही संधी आहे. त्यांनी आफ्रिकेत मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्स सुरू करावीत, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या देशात शिकणाऱ्या आफ्रिकन मुलांचा अभ्यासक्रम संपल्यानंतर त्यांना येथे काम करण्यासाठी वर्क व्हिसा देण्यात यावा. जेणेकरून ते येथे काम करून त्यांचे कौशल्य सुधारू शकतील, असेदेखील डम्मू रवी यांनी सांगितले.