वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोलंबोमध्ये बुधवारी 17 वर्षाखालील वयोगटाच्या मुलांच्या सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता प्रारंभ होणार असून थेट प्रक्षेपण इलेव्हन स्पोर्टस् वाहिनीवर केले जाणार आहे.
या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी सरावावर अधिक भर दिला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ करताना भूतानवर विजय मिळविला पण त्यानंतर प्राथमिक गटातील दुसऱया सामन्यात भारताला नेपाळकडून 1-3 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला. दरम्यान या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय फुटबॉलपटूंनी दर्जेदार खेळ करत बांगलादेशचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेमध्ये यापूर्वी झालेल्या सामन्यातील चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी भारतीय संघातील खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षकापासून मार्गदर्शन मिळत आहे. या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ विजयासाठी कदाचित नवे डावपेच आखण्याची शक्यता आहे. श्रीलंकेत ही स्पर्धा होत असल्याने भारतीय संघाचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकाकडून प्रयत्न केले जातील पण या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपली कामगिरी दर्जेदार कशी होईल, यावर लक्ष केंद्रीत करणे जरुरीचे आहे, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक बिबीयानो यांनी म्हटले आहे.