वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वनडे संघाचा कर्णधार शिखर धवन आता न्यूझीलंडविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. संघाच्या हितासाठी आपण वेळ पडल्यास कठोर निर्णय घेऊ शकतो. तसेच पुरेशी परिपक्वता आल्याने असे निर्णय घेण्यात अडचण येणार नाही, असे प्रतिपादन शिखर धवनने केले आहे.
शिखर धवनने यापूर्वी विविध मालिकांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. भारताच्या दुय्यम संघाचे नेतृत्व करताना आपल्याला विशेष अवघड गेले नाही. संघाचे नेतृत्व करताना माझ्यात नवखेपणा नसल्याचे त्याने म्हटले आहे. नेतृत्वाचा अनुभव मला बऱयापैकी असून कठोर निर्णय कोणत्याही खेळाडूविरुद्ध घेताना मी चलबिचल होणार नाही, असेही धवनने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडच्या कालावधीत वनडे मालिकेत लंकेचा 3-2, दक्षिण आफ्रिकेचा 2-1 तर विंडीजचा 3-0 असा पराभव केला आहे. विविध सामन्यात खेळण्याची संधी अधिक मिळाली तर निर्णय घेताना आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. संघाचे नेतृत्व करताना बऱयाचवेळा विशिष्ट खेळाडूसंदर्भात संघाच्या हितासाठी कठोर निर्णय घ्यावा लागतो. पण त्यामध्ये कोणताही वैयक्तिक हेतू नसतो, असेही धवनने म्हटले आहे.
संघाचे नेतृत्व करताना समतोलपणा आणि संघ सहकाऱयांवरील विश्वास या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. यामध्येच नेतृत्वाचा खरा कस लागतो. यापूर्वी आपणाला संघाचे नेतृत्व करताना केवळ क्वचित क्षणी मानसिक दडपण आल्याचे जाणवले होते. पण आता ही समस्या माझ्याबाबतीत राहणार नाही. कर्णधारपदाचे गुण आणि क्षमता ही सिद्ध करण्यासाठी संघामध्ये समतोलता राखणे अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे धवनने म्हटले आहे. सध्या देशामध्ये रणजी तसेच आयपीएल स्पर्धांमध्ये अनेक युवा क्रिकेटपटूंना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील क्रिकेटपटूच्या कामगिरीची दखल निवड समिती सदस्यांना घ्यावी लागते. या विविध स्पर्धातूनच अनेक होतकरू आणि दर्जेदार क्रिकेटपटू देशाला लाभत असतात, असे 36 वषीय शिखर धवनने म्हटले आहे.
आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविण्यात आले होते. 2018, 2019, 2020 आणि 2022 च्या आयपीएल हंगामामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबला प्लेऑफ फेरी गाठण्यासाठी झगडावे लागले होते. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱया आगामी वनडे मालिकेत भारतीय संघ निश्चितच दर्जेदार कामगिरी करेल, असा विश्वास कर्णधार शिखर धवनने व्यक्त केला.