ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात मंदिर-मशीदीवरून वाद सुरू आहेत. भूतकाळातील ऐतिहासिक हिंदू वास्तू संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असून त्या प्रलंबित आहेत. कुतुबमिनार असो, जामा मशीद असो की ताजमहाल, त्यांच्याबाबत नवनवीन दावे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
ग्यापवापी मशिदीबाबत (Gyanvapi Masjid) हिंदू आणि मुस्लिम बाजू समोरासमोर आहेत. त्याची झळ आता इतर राज्यांमध्येही पोहोचली आहे. कर्नाटकातील जामा मशिदीबाबतही असाच दावा करण्यात आला असून, कुतुबमिनार आणि ताजमहालच्या सर्वेक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे एक विधान चर्चेत आले आहे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक पक्षांनी स्वागत केले आहे. यात अनेक विरोधी पक्षांचाही सहभाग आहे.
संघ प्रमुख मोहन भागवत एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात (nagapur) होते. यावेळी त्यांनी येथे दिलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. संघप्रमुख म्हणाले, इतिहास हा असतो जो आपण बदलू शकत नाही. ते ना आजच्या हिंदूंनी बांधले ना आजच्या मुसलमानांनी, त्याकाळी घडले. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे? हे योग्य नाही. आम्हाला वाद का वाढवायचा आहे? रोज नवीन केस आणू नये.
शिवसेना काय म्हणाली?
शिवसेनेने संघप्रमुखांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, त्यांच्या वक्तव्याला माझा पाठिंबा आहे. ही रोजची अराजकता संपली पाहिजे, अन्यथा देशाचे नुकसान होईल. मशिदींमध्ये शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मिरी पंडितांचे प्राण कसे वाचवता येतील याचा विचार करायला हवा.