पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ गांधीनगर
जागतिक अर्थव्यवस्थेला आकार आणि आधार देणाऱया देशांमध्ये आता भारताचाही समावेश झालेला आहे. त्यादृष्टीने भारत आता अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आदी आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ देशांच्या पंक्तीत विराजमान झालेला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते गुजरात आंतरराष्ट्रीय फायनान्स टेकसिटी येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करत होते.
या कार्यक्रमाआधी त्यांनी गांधीनगर येथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी (आयएफएससीए) या संस्थेच्या इमारतीचा शिलान्यास केला. त्याचप्रमाणे इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज (आयआयबीसी) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएससी) यांच्या कनेक्ट प्लॅटफॉर्मचे उद्घाटनही केले.
भारताचे आर्थिक महत्त्व
गेल्या काही वर्षात जागतिक पातळीवर भारताचे आर्थिक महत्त्व मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. कोणत्याही बलाढय़ देशाला आर्थिक निर्णय घेताना भारताचा विचार करावाच लागतो. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर आदी आर्थिकदृष्टय़ा प्रबळ देश जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकतात आणि या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवितात. आता भारताचाही समावेश या देशांच्या पंक्तीत झाला आहे. अनेक जागतिक आर्थिक शिखर परिषदांमध्ये भारताला आवर्जून आमंत्रित केले जाते. केवळ भारताची बाजारपेठच नव्हे तर तंत्रशक्ती आणि आर्थिक क्षमता यांची ओळख जगाला झाली आहे. गेल्या काही वर्षात लागू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांमुळे भारतात व्यवसाय करणे सुलभ झाल्याचा विश्वास या देशांना वाटतो. परिणामी त्यांनी भारताकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पहावयास प्रारंभ केल्याचे ते म्हणाले.
आर्थिक समावेशकत्वाला सकारात्मक दिशा
गेल्या आठ वर्षात भारतामध्ये आर्थिक समावेशकत्वाची नवी लाट आली आहे. ज्या वित्तसंस्था इतकी दशके गरिबांपासून आणि सर्वसामान्यांपासून दूर होत्या, त्या आता त्यांच्याजवळ आल्या आहेत. आर्थिक सुधारणांमुळे थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारतात 6 लाख 31 हजार 50 कोटी रुपयांची विक्रमी विदेशी गुंतवणूक झाली. याशिवाय उत्पादन क्षेत्रात (मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर) याच वर्षात एफडीआय इक्विटी इनफ्लो 1 लाख 58 हजार 332 कोटींवर पोहोचला. 2020-21 मध्ये तो 89 हजार 766 कोटी रुपयांचा होता. ही वाढ एका वर्षात 76 टक्के इतकी आहे. केंद्र सरकारने ही माहिती शुक्रवारी लोकसभेतही सादर केली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगारांची संख्याही वाढीस लागली असून कोरोना काळात निर्माण झालेली आर्थिक मंदगती मागे टाकून आता देश नवी आर्थिक झेप घेण्यास सज्ज झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
गुजरात आघाडीवर
विदेशी गुंतवणूक तसेच अन्य आर्थिक निकषांवर गेल्या दोन वर्षात गुजरातने आपली आघाडी राखल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. थेट विदेशी गुंतवणुकीतही गुजरातने प्रतिस्पर्धी राज्यांना मागे टाकल्याचा दावा करण्यात आला. कोरोनाकाळातही राज्य सरकारने आर्थिक विकासाची घट रोखून धरली होती. याचा लाभ राज्याला आगामी काळात होणार असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.