पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आमनेसामने, रोहितसेनेला मागील पराभवाचा वचपा काढण्याची संधी
दुबई / वृत्तसंस्था
भारतीय संघ आज (रविवार दि. 28) आशिया चषक स्पर्धेत कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उभा ठाकेल, त्यावेळी नव्या बॅटिंग फिलॉसॉफीसह सज्ज असणारा कर्णधार रोहित शर्मा आणि बॅड पॅचवर मात करत क्रॉसरोड्सची प्रचिती देण्यासाठी आसुसलेला विराट कोहली हे भक्कम आधारस्तंभ असतील. 10 महिन्यांपूर्वी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला, त्याचा हिशेब चुकता करण्याचीही आज नामी संधी असेल. थोडक्यात भारताने आज पलटवार केलाच पाहिजे!
साधारणपणे मागील दशकभरापासून रोहित शर्मा व विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे मजबूत पिलर ठरत आले आहेत. आता पाकिस्तानसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाताना रोहित पुन्हा एकदा अल्ट्रा अग्रेसिव्ह ऍप्रोचव भर देईल आणि विराटच्या पुनरागमनासाठी हे परफेक्ट प्लॅटफॉर्म असेल, अशी अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा उंबरठय़ावरच असल्याने त्या धर्तीवर देखील भारतासाठी यंदाची आशिया चषक स्पर्धा संघाच्या जडणघडणीसाठी विशेष महत्त्वाची असेल. मागील 10 वर्षात भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होणे ठप्पच झाले असताना केवळ अशा बहुदेशीय स्पर्धांमध्येच दोन्ही संघ आमनेसामने भिडत आले आहेत. साहजिकच, वर्षभरातून केवळ एक किंवा दोनच वेळा समोर उभे ठाकणाऱया संघाविरुद्ध कशी तयारी असावी, हा प्रश्नच असतो. 10 महिन्यांपूर्वी भारताने पाकिस्तानविरुद्ध लढत खेळली, त्यावेळी शाहिन गोलंदाजीत किती प्रगल्भ झाला होता, त्याची कल्पनाच नव्हती आणि याची पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली होती. यंदा शाहिन आफ्रिदी पाकिस्तानी संघात नसल्याने भारताला बराचसा दिलासा लाभू शकेल.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या गैरहजेरीत व्हीव्हीएस लक्ष्मण यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली असून फलंदाजीत आघाडीवीरांकडून बडय़ा अपेक्षा असणे साहजिक आहे. रिषभ पंत-रोहित शर्मा ही जोडी गोलंदाजांवर तुटून पडण्यात यशस्वी ठरली असून सूर्यकुमार यादवने देखील लक्षवेधी योगदान दिले आहे. दीपक हुडानेही आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. पण, आता कोहली व केएल राहुल उपलब्ध असल्याने अनुभवाला प्राधान्य मिळेल, असे संकेत आहेत.
बाबर आझमचा धोका?
मागील बऱयाच वर्षात पाकिस्तान क्रिकेटमध्ये जे महान खेळाडू घडले, त्यापेक्षा बाबर आझम बराच वेगळा आहे. बाबर आझमकडे गुणवत्ता आहे. शिवाय, संयम देखील आहे आणि याचा उत्तम मिलाफ त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साधला आहे. संतापून खेळण्याऐवजी तंत्रशुद्ध खेळावर भर आणि सोबतीला मोहम्मद रिझवानसारखा सहकारी यामुळे पाकिस्तान आणखी तगडा प्रतिस्पर्धी ठरत आला आहे. या पार्श्वभूमीवर, आझम-रिझवान जोडी शक्य तितक्या लवकर फोडण्याचे आव्हान प्रत्येक प्रतिस्पर्धी संघासमोर असणार आहे. तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरणारा फखर झमान देखील मोठे आव्हान उभे करण्याची क्षमता राखून असतो.
ना पाकिस्तानकडे शाहिन, ना भारताकडे बुमराह!
शाहिन आफ्रिदी संघात नाही, हा पाकिस्तान संघासाठी मोठा धक्का असला तरी भारतीय संघाला देखील आज यॉर्कर्स स्पेशालिस्ट बुमराहशिवायच मैदानात उतरावे लागेल, ही वस्तुस्थिती आहे. हर्षल पटेल दुखापतीमुळे बाहेर असल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाची भिस्त भुवनेश्वर कुमार व युवा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट अर्शदीप सिंगवर असेल. अर्शदीपच्या स्कील्सची येथे परीक्षा होईल. शिवाय, तो दडपण कसे हाताळू शकेल, हे देखील सुस्पष्ट होईल. रविंद्र जडेजा व हार्दिक पंडय़ाची हजेरी संघाचे बलस्थान असेल. मात्र, अवेश खानऐवजी अश्विन किंवा बिश्नोईच्या रुपाने भारत अतिरिक्त फिरकीपटू खेळवणार का, हे पहावे लागेल.
संभाव्य संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, फखर झमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाझ, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
आशिया चषकातील आजवरचे विजेते
हंगाम / ठिकाण / विजेता
1983-84 / युएई / भारत
1985-86 / श्रीलंका / श्रीलंका
1988-89 / बांगलादेश / भारत
1990-91 / भारत / भारत
1994-95 / युएई / भारत
1997 / श्रीलंका / श्रीलंका
2000 / बांगलादेश / पाकिस्तान
2004 / श्रीलंका / श्रीलंका
2008 / पाकिस्तान / श्रीलंका
2010 / श्रीलंका / भारत
2011-12 / बांगलादेश / पाकिस्तान
2013-14 / बांगलादेश / श्रीलंका
2016 / बांगलादेश / भारत
2018 / युएई / भारत
आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा
फलंदाज / संघ / सामने/ धावा / सर्वोच्च / सरासरी / शतके / स्ट्राईक रेट
सनथ जयसूर्या / श्रीलंका / 25 / 1220 / 130 / 53.04 / 6 / 102.52
कुमार संगकारा / श्रीलंका / 24 / 1075 / 121 / 48.86 / 4 / 84.51
सचिन तेंडुलकर / भारत / 23 / 971 / 114 / 51.10 / 2 / 85.47
शोएब मलिक / पाकिस्तान / 21 / 907 / 143 / 64.78 / 3 / 93.02
रोहित शर्मा / भारत / 27 / 883 / 111ना. / 42.04 / 1 / 90.01
सर्वाधिक बळी
गोलंदाज / संघ / सामने / बळी / सरासरी / सर्वोत्तम / स्ट्राईकरेट / इकॉनॉमी
लसिथ मलिंगा / श्रीलंका / 15 / 33 / 18.84 / 5-34 / 24.0 / 4.70
मुरलीधरन / श्रीलंका / 24 / 30 / 28.83 / 5-31 / 46.0 / 3.75
अजंथा मेंडिस / श्रीलंका / 8 / 26 / 10.42 / 6-13 / 15.6 / 3.98
सईद अजमल / पाकिस्तान / 12 / 2 / 19.40 / 3-26 / 27.6 / 4.21
युएईमध्ये प्रत्येक वेळी भारतच चॅम्पियन!
आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातच्या भूमीत खेळवली जाण्याची यंदा ही चौथी वेळ आहे आणि योगायोग म्हणजे या भूमीत आजवर झालेल्या तिन्ही आशिया चषक स्पर्धांमध्ये भारतानेच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. 1984 मध्ये आशिया चषक प्रथमच संयुक्त अरब अमिरातीत भरवले गेले, त्यावेळी सुनील गावसकरांच्या नेतृत्वाखाली भारताने लंकेला हरवत जेतेपद मिळवले. त्यानंतर 11 वर्षांनंतर मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला 8 गडय़ांनी नमवत दुसऱयांदा या भूमीत चषक पटकावला. 4 वर्षांपूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशला 3 गडय़ांनी नमवत जेतेपदावर आपली मोहोर उमटवली आणि युएई भूमीत जेतेपद पटकावण्याची परंपरा कायम राखली.
आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक लढत
वर्ष / विजयी संघ / अंतर
1984 / भारत / 54 धावा
1988 / भारत / 4 गडी
1995 / पाकिस्तान / 97 धावा
1997 / निकाल नाही
2000 / पाकिस्तान / 44 धावा
2004 / पाकिस्तान / 54 धावा
2008 / पाकिस्तान / 8 गडी
2008 / भारत / 6 गडी
2010 / भारत / 3 गडी
2012 / भारत / 6 गडी
2014 / पाकिस्तान / 1 गडी
2016 / भारत / 5 गडी
2018 / भारत / 8 गडी
2018 / भारत / 9 गडी
सर्व क्रिकेट प्रकारात 100 सामने खेळणारा विराट पहिला भारतीय खेळाडू
भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत आज पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी विराट कोहलीचा हा 100 वा टी-20 सामना असेल. शिवाय, सर्व क्रिकेट प्रकारात 100 सामने खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल.
विराट कोहलीने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असून सातत्य व कणखर बाण्याच्या बळावर त्याने वनडे, कसोटी व टी-20 अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात 100 व त्याहून अधिक सामने खेळण्याचा पराक्रम गाजवला.
आतापर्यंत विराटने 99 टी-20 सामन्यात 50.12 च्या सरासरीने 3308 धावा जमवल्या असून या क्रिकेट प्रकारात 94 ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे. यात त्याने 30 अर्धशतके देखील झळकावली आहेत. 2017 ते 2021 या कालावधीत त्याने 50 सामन्यात नेतृत्वाची धुरा सांभाळली असून यात त्याची कामगिरी 30 विजय, 16 पराभव अशी राहिली. याशिवाय, 2 सामने टाय झाले तर 2 लढतींचा निकाल लागू शकला नाही. या क्रिकेट प्रकारात त्याची विजयाची टक्केवारी 64.58 अशी लक्षवेधी राहिली आहे.
सर्व क्रिकेट प्रकारात विराट कोहलीचे योगदान
क्रिकेट प्रकार / सामने / धावा / सर्वोच्च / सरासरी / शतके / अर्धशतके
कसोटी / 102 / 8074 / 254ना. / 49.53 / 27 / 28
वनडे / 262 / 12344 / 183 / 57.68 / 43 / 64
टी-20 / 99 / 3308 / 94ना. / 50.12 / 0 / 30
रोहितला पाकिस्तानी चाहता म्हणाला, इस बार हाथ हलका रखना, हमारे बॉलर नये है!
शनिवारी सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाईसह चर्चा करत असताना रेलिंगजवळ असलेल्या काही पाकिस्तानी चाहत्यांनी रोहितला फोटोसाठी विनंती केली आणि रोहितही ती विनंती मान्य करत त्या चाहत्याजवळ पोहोचला. ‘सेमी-हग’ देण्याची चाहत्याची आणखी एक विनंतीही रोहितने पूर्ण केली.
सदर पाकिस्तानी चाहता नंतर म्हणाला, ‘मी फक्त रोहितला जवळून पाहण्यासाठी पाकिस्तानमधून इथवर आलो. पण, रोहित विनंतीला मान देऊन आमच्यापर्यंत पोहोचला, तो आश्चर्याचा सुखद धक्का होता. मी पाकिस्तानचा चाहता असलो तरी रोहितबद्दल मला आदर आहे. त्याची खेळाप्रती तळमळ आणि त्याचा क्लास वाखाणण्याजोगे आहे’.
आणखी एका चाहत्याने रोहितला मृदू स्वरात सांगितले, ‘इस बार हाथ हलका रखना, हमारे बॉलर नये है’!
शाहिद आफ्रिदीला आजही सतावतेय ती खंत!
पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदीचे अलीकडील कालावधीत भारतीय खेळाडूंशी फारसे जमत नसले तरी त्याने 2006 मध्ये पाकिस्तान दौऱयावर असलेल्या भारतीय संघाला आपल्या घरी डिनरला बोलावले होते. त्या डिनरवेळी आपण यजमान या नात्याने पाहुणचार करण्यात कसे कमी पडलो, याची खंत त्याने अलीकडेच व्यक्त केली. तो म्हणाला, ‘चिकन-मटण-टिक्का बेत केला. पण, ज्यावेळी संघातील खेळाडू घरी पोहोचले, त्यावेळी त्यातील काही खेळाडू शाकाहारी असल्याचे कळाले आणि मला धक्का बसला. कारण, अशी आम्ही तयारीच केली नव्हती. त्यानंतर घाईघाईने दाल-सब्जी करणे भाग होते. यजमान या नात्याने असे कमी पडणे माझ्यासाठी लाजिरवाणे होते’.
खरा कस लागणार तो कर्णधारांचा !
रोहित शर्मासाठी वर्ल्डकपपूर्वी पहिलीच परीक्षा!
ऑस्ट्रेलियातील आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा उंबरठय़ावर असताना त्यापूर्वी यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्मासाठी कर्णधार या नात्याने ही पहिलीच परीक्षा असेल. रोहितने यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार या नात्याने आयपीएलमध्ये भरीव यश मिळवले. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कारणांमुळे भारताला मात्र तो तितके यश मिळवून देऊ शकलेला नाही. आता या दोन आठवडय़ांच्या कालावधीत संघसहकाऱयांकडून सातत्यपूर्ण कामगिरी करवून घेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यास रोहितसाठी ते मोठे यश ठरेल.
बाबर आझम देखील आक्रमक पवित्र्यावर भर देणार
2021 टी-20 वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानने ती स्पर्धा चांगलीच गाजवली होती आणि त्यात बाबर आझमचा सिंहाचा वाटा होता. त्याने स्पर्धेत 6 सामन्यात 303 धावा फटकावल्या आणि सर्वोच्च धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानही संपादन केले. पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून फडशा पाडला, त्यावेळी देखील बाबरनेच 68 धावांची लक्षवेधी खेळी साकारली होती. त्याच कामगिरीची येथेही पुनरावृत्ती करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.