दुबई / वृत्तसंस्था
आशिया चषक स्पर्धेतील सलामी लढतीत भारत व पाकिस्तान या दोन्ही संघांना स्लो ओव्हर-रेटमुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. आयसीसी इलाईट पॅनेलचे जेफ क्रो यांनी कारवाईची घोषणा केली. रोहित शर्मा व बाबर आझम यांचे संघ निर्धारित वेळेअखेर दोन षटके शॉर्ट होते. दोन्ही संघांतील खेळाडूंना मानधनातील 20 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. दोन्ही कर्णधारांनी यावर आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे स्वतंत्र सुनावणीची गरज भासली नाही, असे आयसीसीने पत्रकाद्वारे जाहीर केले. भारताने त्या रोमांचक लढतीत 5 गडी राखून विजय प्राप्त केला. त्या सामन्यात स्लो ओव्हर-रेटमुळे पाकिस्तानला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत ठेवावा लागला होता.