त्रयस्थ देशाने हस्तक्षेप न करण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ मनिला
भारत आणि फिलिपाईन्स यांच्यादरम्यान दक्षिण चीन समुद्रातील युद्धाभ्यासावर चीनने आक्षेप घेतला आहे. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्यामुळे कुठल्याही त्रयस्थ देशाच्या शांततेला नुकसान पोहोचू नये असे वक्तव्य चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कोल वु यांनी केले आहे.
चीन आणि फिलिपाईन्स यांच्यातील सागरी वादात कुठल्याही तिसऱ्या देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. आम्ही आमच्या देशाची सुरक्षा आणि सागरी अधिकारांसाठी आवश्यक पावले उचलत राहू असे कोल वु यांनी म्हटले आहे.
फिलिपाईन्स आणि भारतीय नौदलाने अलिकडेच युद्धाभ्यास केला आहे. यात भारताच्या वतीने आयएनएस कदमत आणि फिलिपाईन्सकडून बीआरपी रेमन अल्कराज या युद्धनौकेने भाग घेतला होता. तर काही दिवसांपूर्वी चिनी तटरक्षक दलावर फिलिपाईन्सच्या जहाजांवर वॉटर कॅननद्वारे हल्ला करण्याचा आरोप झाला होता.
हे आरोप खोटे आहेत. चीनकडून सातत्याने इशारे मिळून देखील फिलिपाईन्स आमच्या क्षेत्रात घुसखोरी करत आहे. फिलिपाईन्सचे जहाज आमच्या तटरक्षक दलाच्या नौकेला धडकले होते. अशाप्रकारचे कृत्य अत्यंत धोकादायक आणि बेजबाबदारपणाचे आहे. या कृत्यांमुळेच कायद्याच्या कक्षेत राहून आमच्या तटरक्षक दलाने आवश्यक पावले उचलली असून ती पूर्णपणे योग्य आहेत असा दावा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
याप्रकरणी अमेरिकेकडून आक्षेप नोंदविण्यात आला होता. यावर चीनने आम्ही अशाप्रकारच्या वक्तव्यांना बळ देत नसल्याचे म्हटले आहे. तसेच फिलिपाईन्सच्या क्षेत्रावर दावा सांगत आहे तो चीनचा हिस्सा आहे. अमेरिका फिलिपाईन्सला आमच्या विरोधात चिथावणी देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चीनकडून करण्यात आला आहे.
डिसेंबरच्या प्रारंभी दक्षिण चीन समुद्रात चीनच्या तटरक्षक दलाच्या नौकेने फिलिपाईन्सच्या जहाजांवर हल्ला केला होता. चीनच्या नौकेकडून मच्छिमारांच्या जहाजांवर वॉटर कॅननद्वारे हल्ला करण्यात आला होता. फिलिपाईन्सने चीनच्या या अवैध आणि आक्रमक कृतीची निंदा केली होती. दक्षिण चीन समुद्रात फिलिपाईन्स आणि चीन यांच्यात अशाप्रकारचा संघर्ष अनेकदा झाला आहे.