वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये भारतीय फुटबॉल संघाने नवा इतिहास घडविला आहे. 2022 साली होणाऱया फिफा-ई नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारताने पहिल्यांदाच आपली पात्रता सिद्ध केली आहे. सदर स्पर्धा 27 ते 30 जुलै 2022 साली दरम्यान डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे होणार आहे.
फिफा-ई नेशन्स सिरीज 2022 च्या फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताने प्ले ऑफ गटातील लढतीत कोरिया प्रजासत्ताक आणि मलेशियाचा पराभव करत पहिल्यांदा फिफा-ई नेशन्स चषक 2022 च्या फुटबॉल स्पर्धेचे तिकीट आरक्षित केले आहे. फिफा-ई नेशन्स सिरीज 2021 च्या स्पर्धेत भारतासह एकूण 60 देशांनी आपला सहभाग दर्शविला होता. मिडल इस्ट आणि आफ्रिका विभाग अशा दोन गटामध्ये ही स्पर्धा खेळविली गेली आणि भारताने आपल्या विभागातून तिसरे स्थान मिळविल्याने त्यांना फिफा-ई 2021 नेशन्स प्ले ऑफची संधी थोडक्यात हुकली होती.
2022 हंगामात भारताचा आशिया ओसेनिया विभागात समावेश होता. या विभागातून भारताने प्ले ऑफ गटात थेट प्रवेश केला. प्ले ऑफ गटासाठी झालेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताने 32 सामने खेळले असून त्यापैकी 12 सामने जिंकले तर 11 सामने गमविले व 9 सामने बरोबरीत राखले. या कामगिरीमुळे भारताने विभाग-1 मधील आपले स्थान कायम राखले. त्यानंतर भारतीय फुटबॉल संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत प्ले ऑफ गटात स्थान मिळविले. भारताने गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकाविले. 2022 फिफा-ई नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतानजीक झेप घेतली. भारताला ग्लोबल मानांकनात 19 वे स्थान मिळाले. प्ले ऑफ गटात भारताला केवळ दोन सामने जिंकणे जरूरीचे होते आणि भारताने कोरिया प्रजासत्ताक व मलेशिया यांचा पराभव करत नेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. आता भारतीय फुटबॉल संघ जुलै अखेरीस डेन्मार्कला रवाना होईल.