ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पर्यावरण कामगिरी निर्देशांकात (Environmental Performance index) भारत 180 देशांमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे. येल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल लॉ अँड पॉलिसी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी सेंटर फॉर इंटरनॅशनल अर्थ सायन्स इन्फॉर्मेशन नेटवर्कद्वारे नुकताच 180 देशांचा 2022 वर्षासाठीचा पर्यावरण कामगिरी अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये भारत निचांकी 18.9 गुण मिळवत सर्वांत शेवटच्या म्हणजे 180 व्या क्रमांकावर आहे. ही बाब भारतासाठी चिंता वाढवणारी आहे.
या पर्यावरण कामगिरी निर्देशांकात डेन्मार्क अव्वल आहे. त्यानंतर ब्रिटन, फिनलंड अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अलिकडच्या वर्षात हरितगृह वायू उत्सर्जन कपातीचे सर्वाधिक गुण या देशांना मिळाले आहेत. धोकादायक हवेची गुणवत्ता आणि वेगाने वाढणारे हरितगृह वायू उत्सर्जन यामुळे भारत प्रथमच क्रमवारीत तळाला गेला आहे. चीन 28.4 गुणांसह 161 क्रमांकावर आहे. मात्र, भारत व चीन हे दोन्ही देश 2050 पर्यंत सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जन करणारे देश बनतील, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.
पश्चिमेतील 22 श्रीमंत देशांमध्ये अमेरिका 20 व्या तर या यादीत 43 व्या क्रमांकावर आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनादरम्यान पर्यावरण संरक्षक उपाय मागे घेतल्यामुळे तुलनेने कमी रँकिंग असल्याचे सांगण्यात येते. ईपीआयने एकूण 11 श्रेणींमध्ये 40 कामगिरी निर्देशकांचा वापर करून हवामान बदलाची कामगिरी, पर्यावरणीय आरोग्य आणि इकोसिस्टम परिस्थितीवर आधारित 180 देशांना गुण दिले आहेत. सर्वात कमी गुण भारत (18.9), म्यानमार (19.4), व्हिएतनाम (20.1), बांगलादेश (23.1) आणि पाकिस्तानने (24.6) नोंदवले. कमी गुण मिळवणारे बहुतेक देश असे आहेत, ज्यांनी स्थिरतेपेक्षा आर्थिक विकासाला प्राधान्य दिले किंवा ज्यांना अशांतता आणि इतर संकटांचा सामना करावा लागला आहे.