वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
येथे सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 तिरंगी मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी यापूर्वीच अंतिम फेरी गाठली आहे. हा अंतिम सामना 2 रोजी खेळविला जाणार आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी सामना खेळविला जाणार असून हा सामना म्हणजे उभय संघांची अंतिम सामन्यासाठीची ही रंगीत तालीम म्हणावी लागेल.
या तिरंगी मालिकेत भारत, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज या संघांचा सहभाग आहे. पण विंडीज संघाने या मालिकेतील आपले पहिले तिन्ही सामने गमाविल्याने त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न यापूर्वीच समाप्त झाले आहे. या स्पर्धेतील विंडीज विरुद्धच्या लीग सामन्यामध्ये भारतीय संघातील स्मृती मंदाना आणि कर्णधार हरमनप्रित कौर यांना धावा जमविण्यासाठी झगडावे लागले होते. दक्षिण आफ्रिकाबरोबर शनिवारी होणाऱया सामन्यात कदाचित भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याचा प्रयोग होऊ शकेल. शेफाली वर्माच्या गैरहजेरीत यास्तिका भाटियाला पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करणे अवघड जात असल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण करणाऱया अमनज्योत कौरने या स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखल्याने तिला कदाचित फलंदाजीत बढती मिळू शकेल. हरलिन देओलला गेल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. अष्टपैलू पूजा वस्त्रकर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे जाणवते. शिखा पांडेचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते. भारतीय महिला संघाने विंडीजचा दहा गडय़ांनी दणदणीत पराभव करून या तिरंगी मालिकेची अंतिम फेरी निश्चित केली. शनिवारच्या या सामन्याला रात्री 10.30 वाजता प्रारंभ होत आहे.