विराट कोहली-दक्षिण आफ्रिका वेगवान गोलंदाजांमध्ये खरी लढत
वृत्तसंस्था/ पर्थ
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गट 2 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी येथे होणाऱया चुरशीच्या सामन्यात कोहलीची फलंदाजी आणि दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी यांच्यातच खरी लढत पहावयास मिळेल.
या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताचा प्रमुख फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीला योग्यवेळी फलंदाजीचा सूर मिळाला असल्याने भारताने आपल्या सलामीच्या सामन्यातच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. त्यानंतर दुसऱया सामन्यात नेदरलँडस्चा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. गट 2 च्या गुणतक्त्यात भारताने दोन सामन्यात चार गुणासह पहिले स्थान मिळवले आहे. तर दक्षिण आफ्रिका दुसऱया स्थानावर असून त्यांनी 2 सामन्यातून 3 गुण घेतले आहेत. या गटात झिंबाब्वे संघाने पाकिस्तानला पराभवाचा धक्का देत गुणतक्त्यात तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिका झिंबाब्वे यांनी समान तीन गुण मिळवले असले तरी सरस धावसरासरीत दक्षिण आफ्रिकेने त्यांना मागे टाकले आहे. या गटामध्ये दक्षिण आफ्रिकेने 5.200 अशी सर्वोच्च धाव सरासरी राखली आहे.
रविवारचा हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा राहिल असा अंदाज अनेक मातब्बर क्रिकेटपटूंनी व्यक्त केला आहे. भारतीय संघातील कोहली, कर्णधार शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची फलंदाजी बहरत असून दक्षिण आफ्रिकेतील रॉसोची बॅट तळपत आहे. रॉसोने या स्पर्धेत सलग दोन शतके झळकवली आहेत. दक्षिण आफ्रिका संघातील वेगवान गोलंदाज रबाडा तसेच नॉर्त्जे यांची कामगिरी समाधानकारक होत आहे. पर्थची खेळपट्टी स्विंग गोलंदाजीला अधिक अनुकूल असल्याने भारतीय फलंदाजांना फटकेबाजी करताना सावध रहावे लागेल. अलीकडेच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱया विराट कोहलीला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवते. यापूर्वी तो अधिक धावा जमविण्यासाठी झगडत होता. विराटने अलीकडच्या कालावधीत 12 डावात 78.28 धावांच्या सरासरीने 548 धावा जमविल्या असून त्यामध्ये 5 अर्धशतके आणि एक शतकाचा समावेश आहे. नाबाद 122 ही विराटची सर्वोत्तम खेळी आहे.
दक्षिण आफ्रिका संघातील फलंदाज रिली रॉसोने आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारच्या सामन्यात दणकेबाज शतक झळकवले. तसेच टी-20 या क्रिकेटच्या प्रकारात सलग दोन शतके नोंदवणारा रॉसो हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. भारतीय संघाने नेदरलँडचा 56 धावांनी तर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 104 धावांनी पराभव यापूर्वीच्या सामन्यात केले आहे. आता हे दोन्ही बलाढय़ संघ रविवारी पर्थच्या खेळपट्टीवर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. सलामीचा फलंदाज के. एल. राहुल अधिक धावा जमवण्यासाठी झगडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रविवारच्या सामन्यात कदाचित त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करण्याची शक्यता वर्तवली जाते. गेले दोन सामने जिंकणाऱया भारतीय संघामध्ये रविवारच्या सामन्यासाठी बदल होईल, असे वाटत नाही.