दूतावासातील अधिकाऱ्यांची संख्या 41 ने कमी करण्याची सूचना
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताने कॅनडाला त्याच्या 41 मुत्सद्द्यांना माघारी बोलाविण्याची सूचना केली आहे. त्यांना माघारी बोलाविण्यासाठी 10 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कॅनडाचे 62 मुत्सद्दी सध्या भारतात आहेत. त्यांच्यापैकी 41 जणांना माघारी जावे लागेल, असे दिसून येत आहे. कॅनडातील खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी घडविल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त झाले आहेत. भारतानेही कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
काही दिवसांपूर्वीही भारताने कॅनडाला दूतावासातील अधिकारी आणि मुत्सद्द्यांची संख्या कमी करण्याची सूचना दिली होती. भारताचे जितके मुत्सद्दी कॅनडात आहेत, तितकेच कॅनडाचे भारतात असावेत असे भारताचे म्हणणे आहे. सध्याच्या काळात दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त असताना या सूचनेला अधिक महत्व प्राप्त झाले असून कॅनडाला आपल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी करावी लागणार आहे, असे मत अनेक आंतरराष्ट्रीय राजकीय तज्ञांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सूचना
आपल्या मुत्सद्द्यांची संख्या कमी करण्याची भारताने कॅनडाला केलेली सूचना आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार केली आहे. अशी सूचना करण्याचा अधिकार प्रत्येक देशाच्या सरकारला असतो. विशेषत: दोन देशांमधील परस्पर संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो तेव्हा ही कारवाई केली जाते. आपले जितके अधिकारी विशिष्ट देशात आहेत, तितकेच अधिकारी त्या देशाने पाठवावेत, अशी सूचना कोणत्याही देशाला करण्याचा प्रत्येक देशाला अधिकार असतो. सहसा अशा सूचनेनंतर अधिकारी कमी केले जातात, असा प्रघात आहे.
संबंधांवर परिणाम नाही
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव असला आणि तो केव्हा नाहीसा होणार यासंबंधी सध्या कोणतेही अनुमान करता येणार नसले तरी, कॅनडाशी निकटचे संबंध असणाऱ्या अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांशी भारताच्या असणाऱ्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे दिसून येत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाशी भारताची धोरणात्मक भागीदारी आहे. प्रशांत-हिंदी महासागर परिसरातील परिस्थिती हे या भागीदारीचे प्रमुख कारण आहे. तसेच भारत ही एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याने या देशांशी भारताचे निकटचे आर्थिक संबंधही असून ते उत्तरोत्तर अधिक वृद्धिंगत होत आहेत. ही प्रक्रिया पुढेही चालत राहील असे दिसत आहे.
आरोपांमध्ये तथ्य नाही
कॅनडाने भारताविरोधात केलेल्या बेछुट आरोपांचा भारताने स्पष्ट आणि ठाम शब्दांमध्ये इन्कार केला आहे. कॅनडाने आपल्या आरोपांच्या पुष्ट्यार्थ कोणताही पुरावा आजवर दिलेला नाही. हा पुरावा मिळाल्यास आणि तो विश्वसनीय आणि निश्चित स्वरुपाचा असल्यास भारत पुढील हालचाली करेल असेही भारताने स्पष्ट केले आहे. मात्र, कॅनडाने केवळ शाब्दिक आरोप केलेले आहेत.
आणखी एका खलिस्तानवाद्याला नोटीस
कॅनडात वास्तव्यास असणारा आणखी एक खलिस्तानवादी दहशतवादी करणवीरसिंग याला भारताच्या सूचनेवरुन इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्याच्यावर भारतविरोधी कारवाया करण्याचा आरोप आहे. तो अनेक गुन्ह्यांच्या संदर्भात भारताला हवा असून ‘मोस्ट वाँटेड’ सूचीत त्याचा समावेश आहे. रेड कॉर्नर नोटीसीमुळे यापुढे करणवीर सिंग याच्या हालचालींवर बंधने येणार आहेत. तसेच त्याला भारताच्या आधीन करण्याचे उत्तरदायित्व कॅनडाचे आहे. निज्जर याच्या विरोधातही भारताने अशी नोटीस काढली होती.
तडजोड अशक्य
ड दहशतवादी शक्तींशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड अशक्य
ड देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जाणार
ड कॅनडाला अधिकारी मागे घेण्यासाठी साद दिवसांचा कालावधी
ड आणखी खलिस्तानवाद्यांवर भारताकडून बारकाईने लक्ष राहणार
कॅनडाच्या पंतप्रधानांना सुचले शहाणपण
भारतासोबतचा वाद वाढविण्याची इच्छा नसल्याचे वक्तव्य कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंगळवारी केले आहे. भारतासोबत जबाबदारीपूर्वक पद्धतीने संबंध वृद्धींगत करणे कायम ठेवणार आहोत. भारतात कॅनेडियन कुटुंबांच्या मदतीसाठी आम्ही तेथे उपस्थित राहू इच्छितो असे ट्रुडो यांनी म्हटले आहे. भारत सरकारच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांच्या भूमिकेत हा बदल झाल्याचे मानले जात आहे.