जीडल्बूइसी आणि एमइसी यांच्या अहवालामध्ये माहिती सादर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत पुढील पाच वर्षांमध्ये 23.7 गीगावॅट पवन ऊर्जा क्षमता साध्य करण्याची शक्यता आहे. ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल (जीडल्बूइसी) आणि इंटेलिजन्स (एमइसी) यांनी एका अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे.
सदर अहवालाच्या तिसऱया वार्षिक आवृत्तीमध्ये ‘रिइन्व्हेंटिंग विंड डेव्हलपमेंट टू ड्राईव्ह एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनः इंडियन विंड एनर्जी मार्केट सिनेरियो-2026’ या शीर्षकाने पवन ऊर्जेच्या विकासावर प्रकाश टाकला आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.
पुढील पाच वर्षांमध्ये देशातील पवन ऊर्जा क्षमता 23.7 गीगावॅटपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यासाठी अनुकूल धोरणे, सुलभ साधने आणि योग्य संस्थात्मक हस्तक्षेप आवश्यक असल्याचेही सांगितले आहे. जीडल्बूइसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेन बेकवेल म्हणाले की, साथीच्या रोगामुळे ऊर्जा निर्मितीस आधीच विलंब झाला आहे. भारताने आता संधीचा त्वरित फायदा घेतला पाहिजे असेही बेकवेल यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या भावी पिढय़ांना सहज श्वास घेता यावा आणि स्वच्छपणे जगता यावे यासाठी स्वच्छ उर्जेचा अवलंब करण्याचा उपक्रम यशस्वी झाला पाहिजे, असे जीडल्बूइसी इंडियाचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.