वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारत 2047 पर्यंत जगातील अव्वल पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये असेल. तीन वर्षांपूर्वी ‘कोविड-19’मुळे उलथापालथ चालू असताना हे उद्दिष्ट साध्य करण्याचा आराखडा तयार करण्यात आला, असे क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले. मांडविया म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत खेळ हे एक भर दिलेले क्षेत्र आहे. ‘जेव्हा देश कोविड-19 च्या लॉकडाऊनमध्ये होता तेव्हा सरकार 2047 च्या दृष्टीने विचारमंथन करत होते आणि 2047 साठी आराखडा बनवत होते. त्या आराख्घ्ड्याचा एक घटक खेळही आहे’, असे मांडविया यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या भारताच्या तयारीवरील चर्चेदरम्यान सांगितले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने दिल्ली स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशनने या चर्चेचे आयोजन केले होते.