ऑनलाईन टीम/तरुण भारत
द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतात २०१९ साली प्रदूषणामुळे २३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात म्हटलं गेलंय. भारतासाठी ही एक मोठी धोक्याची घंटा मानली जातेय.
द लॅन्सेट कमिशन ऑन पोल्यूशन अँड हेल्थने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार २०१९ साली जगात ९० लाख लोकांचा मृत्यू प्रदूषणाच्या कारणाने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जगातील सर्वाधिक मृत्यू हे भारतात झाले आहेत. जवळपास २५ टक्के मृत्यू हे एकट्या भारतात झालेत. त्यामुळे देशासाठी अत्यंत धक्कादायक आणि विचार करायला लावणारी बाब आहे.
जगभरात सहापैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये सुमारे ९ दशलक्ष मृत्यू पर्यावरणातील उच्च पातळीच्या प्रदूषणामुळे झाल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
सुमारे १.६ दशलक्ष मृत्यू केवळ वायू प्रदूषणामुळे झाले आणि ५ लाखाहून अधिक मृत्यू हे जल प्रदूषणामुळे झाले आहेत. जागतिक स्तरावर केवळ वायू प्रदूषणामुळे ६६.७ लाख मृत्यू झालेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ४५ लाख मृत्यू हे सभोवतालचे वायू प्रदूषण आणि १७ लाख मृत्यूला घातक रासायनिक प्रदूषक घटक कारणीभूत होते.
प्रदूषणामुळे मृत्यू होणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानी आहे तर भारताचा शेजारी चीन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.चीनमध्ये प्रदूषणामुळे २१ लाख लोकं मृत्यूमुखी पडले आहेत.
काय म्हटलय अहवाल?
या अहवालावर एक नजर टाकली तर हा अहवाल जागतिक नेत्यांंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा पाहायला मिळतोय. ९० लाख प्रदूषणाच्या बळींपैकी ७५ टक्के लोकांचा मृत्यू हवेतील प्रदुषणानं झाल्याचं हा अहवाल सांगतो.१८ लाखांहन अधिक मृत्यू विषारी रासायनिक प्रदूषणांमुळे झालेत. साल २००० पासून या प्रमाणात तब्बल ६६ टक्के वाढ झाल्याचं हा अहवाल सांगतोय. घरातील वायू प्रदूषण आणि पाण्याच्या प्रदुषणामुळे मरण पावणाऱ्या लोकांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी औद्योगिक प्रदूषणाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये मात्र वाढ पाहायला मिळतेय.