अनेक देशांनी केली होती विनंती : विदेशमंत्री जयशंकर यांचा गौप्यस्फोट : भारत उदासीन असल्याचा पाश्चिमात्यांचा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था / ऑकलंड
दीर्घकाळापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर पूर्ण जगाची नजर लागून राहिली आहे. तर याच मुद्दय़ावर भारताच्या भूमिकेवर पाश्चिमात्य जगताकडून वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. युक्रेनच्या विनंतीनुसार काम करत भारताने रशियावर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी दबाव टाकला होता असे जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले आहे.
युक्रेन संकटावर तोडगा काढण्यासाठी शक्य ते सर्वकाही करण्याची भारताची तयारी आहे. संयुक्त राष्ट्रसंघ अधिवेशनावेळी सर्वात मोठी चिंता जपोरिज्जिया अणुप्रकल्पावरून चिंता होती, कारण त्या प्रकल्पाच्या अत्यंत नजीक लढाई सुरू होती. रशियावर या मुद्दय़ावरून दबाव टाकण्याची विनंती करण्यात आल्यावर आम्ही ते केल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
जपोरिज्जिया अणुप्रकल्प हा दक्षिण पूर्व युक्रेनमध्ये असून तो युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर भारताची तटस्थ भूमिका कायम ठेवत जयशंकर यांन विविध देश काहीशी वेगळी प्रतिक्रिया देणर हे स्वाभाविक असल्याचे विधान केले. युक्रेन संकटाला मोठय़ा प्रमाणात आम्ही पूर्व-पश्चिमचा मुद्दा म्हणून पाहतो, परंतु युक्रेन संकटाचा प्रभाव उत्तर-दक्षिण (उत्तर गोलार्धातील विकसित आणि दक्षिण गोलार्धातील विकसनशील देश) पैलू देखील असल्याचे जयशंकर म्हणाले.
जागतिक व्यवस्थेत बदलाचा विचार केल्यास सुरक्षा परिषदेत भारत असावा याबद्दल आम्ही ठाम आहोत. परंतु पूर्ण आफ्रिका खंड आणि दक्षिण अमेरिकेचे सुरक्षा परिषदेत प्रतिनिधित्व नसल्याचा मुद्दाही आम्ही मांडत आहोत असे विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.