रशियाच्या राजदूताने केले स्पष्ट ः संबंधांवर पडणार नाही प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया आणि भारत हे दोन्ही निरंतर सहकार्य निश्चित करण्यासाठी अत्यंत तत्पर आहेत. दोन्ही देश संरक्षण सहकार्यात उद्भवलेले अडथळे दूर करण्यासाठी प्रभावीपणे काम करत आहेत. रशियाकडून भारताला एस-400 ही जमिनीवरून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा निश्चित मुदतीत केला जाणार आहे. दोन्ही देश संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर परस्परांच्या सोबत असल्याचे उद्गार रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी काढले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे सैन्यप्रणाली अन् उपकरणांच्या पुरवठय़ात विलंब होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत असताना अलीपोव्ह यांनी हा खुलासा केला आहे. संरक्षण सहकार्य रशिया-भारत यांच्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रमुख स्तंभांपैकी एक आहे. समोर आलेल्या अडचणी दूर करत करारांची पूर्तता करण्यास यशस्वी ठरणार आहोत असे अलीपोव्ह यांनी म्हटले आहे.
एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविण्याचा करार निश्चित कार्यक्रमानुसार पार पडणार असल्याचे ते म्हणाले. ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणांचे 5 सेट खरेदी करण्यासाठी रशियासोबत 5 अब्ज डॉलर्सचा करार केला होता.
रशियाने डिसेंबर महिन्यात क्षेपणास्त्रांच्यी पहिली खेप पुरविली होती. या क्षेपणास्त्रांना चीनच्या सीमेसोबत पाकिस्तानच्या सीमेला व्यापण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. लवकरच रशियाकडून क्षेपणास्त्र यंत्रणेची दुसरी खेप पुरविण्यात येणार आहे.