प्ले-ऑफ लढतीत जपानला 1-0 फरकाने नमवले, राजकुमार पालचा 7 व्या मिनिटाला एकमेव गोल
वृत्तसंस्था/ जकार्ता
आशिया चषक पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने जपानचा पराभव करून कांस्य पदक पटकाविले. या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात लढत होत आहे.
भारतीय पुरुष संघाला या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची नामी संधी मिळाली होती. मंगळवारी झालेल्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारताला 4-4 असे बरोबरीत रोखल्याने भारताचे अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. या सामन्यात भारताला निर्णायक विजयाची जरुरी होती. सरस गोल सरासरीच्या जोरावर मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले.
त्यानंतर बुधवारी कांस्य पदकासाठी झालेल्या प्ले-ऑफ सामन्यात भारताने जपानवर 1-0 असा निसटता विजय मिळविला. 7 व्या मिनिटाला राजकुमार पालने मैदानी गोल नोंदवित आपल्या संघाला कांस्य पदक मिळवून दिले. मध्यंतरापर्यंत भारताने जपानवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. जपानला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. जपान आणि भारत या दोन्ही संघांनी सामन्याच्या उत्तरार्धात गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या.