वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरू असलेल्या थॉमस चषक पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत तब्बल 43 वर्षांनंतर पहिल्यांदा भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. या कामगिरीमुळे भारतीय बॅडमिंटन संघाचे या स्पर्धेतील किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. भारताने मलेशियाचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. मात्र महिलांच्या उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले. थायलंडने भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.
थॉमस चषक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारताने यापूर्वी तीन कांस्यपदके मिळविली आहेत. 1979 नंतर भारतीय बॅडमिंटन संघाला या स्पर्धेत पदक मिळविता आलेले नाही. या स्पर्धेच्या पात्र फेरी फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच यावेळी बदल करण्यात आला असून भारताला किमान कांस्यपदक निश्चित मिळणार आहे. गुरूवारी झालेल्या भारत आणि मलेशिया यांच्यातील लढतीत सलामीच्या एकेरी सामन्यात मलेशियाच्या विद्यमान विश्वविजेत्या ली झी जियाने केवळ 46 मिनिटात भारताचा लक्ष्य सेनचा 23-21, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या जोडीने मलेशियाच्या फेई आणि नूर इझुद्दीन या जोडीचा 21-19, 21-15 असा पराभव करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांतने मलेशियाच्या याँगचा 21-11, 21-17 असा पराभव करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱया दुहेरीच्या सामन्यात मलेशियाच्या चिया आणि यी या जोडीने भारताच्या कृष्णा प्रसाद गर्ग आणि विष्णुवर्धन गौड यांच्यावर 21-19, 21-17 अशी मात करत आपल्या संघाला पुन्हा 2-2 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या आणि निर्णायक एकेरी सामन्यात भारताच्या एच.एस. प्रणॉयने मलेशियाच्या 22 वर्षीय जुन लिआँगचा 21-13, 21-8 असा पराभव करत बलाढय़ मलेशियाचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.