वृत्तसंस्था/ दुबई
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत ब गटातील झालेल्या लढतीत भारतीय बॅडमिंटन संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन मलेशियाचा 4-1 अशा फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
ब गटातील या शेवटच्या लढतीअखेर भारताने या गटात आघाडीचे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी या गटात झालेल्या लढतीत भारताने कझाकस्तान आणि संयुक्त अरब अमिरात यांना पराभूत केले होते. आता उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताची लढत हाँगकाँग बरोबर होणार आहे. या स्पर्धेत ड गटात हाँगकाँगने दुसरे स्थान मिळवले आहे.
भारत आणि मलेशिया यांच्यातील या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या नवव्या मानांकित एच. एस. प्रणॉयने विजयी सलामी देताना मलेशियाच्या एशियन चॅम्पियन ली जियाचा 18-21, 21-13, 25-23 अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर महिला एकेरीच्या सामन्यात भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने मलेशियाच्या वाँग चिंगचा 21-13, 21-17 असा फडशा पाडत भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुरुष दुहेरीच्या लढतीत मलेशियाच्या अॅरॉन चिया आणि सो इक या जोडीने भारताच्या चिराग शेट्टी व ध्रुव कपिला यांचा 21-16, 21-10 अशा गेम्समध्ये पराभव करत भारताची आघाडी थोडी कमी केली. त्यानंतर महिला दुहेरीच्या लढतीत भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी मलेशियाच्या पर्ली तेन आणि टी. मुरलीधरन यांचा 23-21, 21-15, असा पराभव केला. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या इशान भटनागर व तनीषा क्रेस्टो यांनी मलेशियाच्या चेन जी व तो वेई यांचा 21-19, 19-21, 21-16 असा पराभव करत मलेशियाच्या पराभवावर शिक्कामोतर्ब केला. 2017 साली पहिल्यांदा झालेल्या या स्पर्धेत भारताला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय बॅडमिंटन संघाने या स्पर्धेत आता दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.