वृत्तसंस्था/ दुबई
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून आपले पहिले पदक निश्चित केले आहे.
आंतरखंडीय बॅडमिंटन स्पर्धेत यावेळी भारताला पहिले पदक निश्चित मिळणार आहे. शुक्रवारी या स्पर्धेतील झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने हाँगकाँगचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. या लढतीत सुरुवातीला हाँगकाँगवर भारतावर 2-0 अशी आघाडी मिळवली होती पण त्यानंतर भारताच्या ध्रुव कपिला, चिराग शेट्टी, त्याचप्रमाणे पी. व्ही. सिंधू यांनी आपले सामने जिंकत हाँगकाँगशी बरोबरी साधली. दरम्यान निर्णायक महिला दुहेरीच्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात हाँगकाँगच्या 14 व्या मानांकित का लाँग अँगस एनजीने भारताच्या लक्ष्यसेनचा 20-22, 21-19, 21-18 असा पराभव केला. हा सामना 70 मिनिटे चालला होता. मिश्र दुहेरीच्या पहिल्या लढतीत हाँगकाँगच्या रिगेनार्ड आणि याऊ एनजी यांनी भारताच्या इशान भटनागर व तनीषा क्रेस्टो यांचा 26-24, 21-17 असा पराभव केला. हाँगकाँगने यावेळी भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली होती. पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या कपिला आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँगच्या तेंग मॅन आणि येंग चोई यांच्यावर 20-22, 21-16, 21-11 अशी मात केली. महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने हाँगकाँगच्या सलोनी मेहताचा 16-21, 21-7, 21-9 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. शेवटच्या निर्णायक महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी हाँगकाँगच्या याऊ एनजी आणि विंग यंग एनजी या भगिनींचा 21-13, 21-12 अशा गेम्समध्ये पराभव करत हाँगकाँगचे आव्हान संपुष्टात आणले.